पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१४८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मध्यम वर्ग व समाजाचे व्यवस्थापन

रित्राणाय साधूनाम् । विनाशायच दृष्कृताम् ।।

 धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे।।
 असंं भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत म्हटलंं आहे. ‘सज्जनांचं संरक्षण, दुष्टांचं निर्दालन आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मी वारंवार अवतार घेतो’ असा याचा अर्थ.
 हा श्लोक वरवर पाहता आध्यात्मिक आहे.भगवान श्रीकृष्ण खरोखर होता का? असला तर 'भगवान' होता का? आणि 'अवतार' वगैरे पुराणातील ‘वांगी' खरी मानणं आजच्या एकविसाव्या शतकात वेडपटपणाचं नाही का? अशा मौलिक शंका संशयात्मे विचारतील. पण या श्लोकात एक सखोल सामाजिक आणि ‘व्यवस्थापकीय’ आशय दडला आहे. तो लक्षात घेतला तर त्याचं महत्व आणि सत्यत्व दोन्ही पटण्यास हरकत नाही.कारण या श्लोकात 'क्रांती'ची व्याख्या सांगितली आहे.
 जसं उद्योग-व्यवसायाचं व्यवस्थापन करावं लागतं तसं 'समाज’ या संस्थेचंही व्यवस्थापन करणं आवश्यक असतं, ते कुणी,कसं आणि का करायचं याचा वेध घेणं हे या व या पुढच्या लेखाचं उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीनं हा श्लोक व त्यातील क्रांतीची व्याख्या महत्त्वाची आहे.
 एखाद्या समाजात सज्जनांना किती मान मिळतो, त्याची पाठराखण कशी केली जाते आणि सामजिक उतरंडीत त्यांचं स्थान कोणतं यावर त्या समाजाची स्थिरता, प्रगती आणि सांस्कृतिक दर्जा अवलंबून असतो. थोडक्यात समाजाचं 'व्यवस्थापन' सज्जनांच्या हाती असेल, तर त्या समाजाची वाटचाल सकारात्मक दिशेने होत असते. या उलट जो समाज दुष्टांना आवर घालण्याची आणि शासन करण्याची क्षमता गमावून बसला आहे त्याचं भवितव्य अंधःकारमय असतं.

 म्हणूनच ज्या वेळी समाजाची सूत्रंं अपप्रवृत्तींच्या हाती जातात,तेव्हा त्याचंं उत्थान करण्यासाठी म्हणजेच क्रांती किंवा परिवर्तन घडविण्यासाठी एक शक्ती जागृत व्हावी लागते. ही शक्ती काही वेळा एखाद्या व्यक्तीच्या स्वरूपात, तर काही वेळा संस्थेच्या

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची /१३९