पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/९९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बाजारमूल्य, माल तयार झाल्यापासून विकला जाईपर्यंतचा (पोस्ट-हार्वेस्ट) खर्च भरून निघेल इतकेदेखील नव्हते. ती तूट भरून काढायलाच खिशातले ३२ रुपये द्यावे लागणार होते! शेतकऱ्यांच्या परिभाषेत यालाच 'उलटी पट्टी' म्हणतात. बियाणे, मजुरी, खते, औषधे, पाणी वगैरे (प्री-हार्वेस्ट) खर्चाचा यात कुठे समावेशही नव्हता! जमिनीवरील इतर खर्च, बँकेचे व्याज, स्वतःच्या श्रमाचे मूल्य व इतर ओव्हरहेड्स यांची गोष्ट तर दूरच राहिली! या सर्व व्यवहारात बियाणे विकणारा, खते-औषधे विकणारा, टेम्पोवाला, दलाल, वजन करणारा मापारी, हमाल, मार्केट कमिटी आणि अगदी मुख्यमंत्री फंड या इतर सर्व घटकांना आपापला वाटा मिळाला होता; नागवला गेला होता तो फक्त मालाचा प्रत्यक्ष उत्पादक, म्हणजेच शेतकरी.

 सगळीच व्यवस्था (सिस्टिम) शेतकऱ्याच्या विरोधात काम करत होती. कुठल्याही विद्यापीठात न शिकवला जाणारा, किंवा कुठल्याही पुस्तकात न नोंदवलेला हा महत्त्वाचा धडा स्वतःचा घाम शेतात जिरवून जोशी शिकत होते.

 असाच दुसरा अनुभव होता परावलंबित्वाचा; बेभरवशी निसर्गावर शेतकरी किती अवलंबून असतो याचा. तो आला बटाट्याच्या पिकाबाबत. भामनेरच्या खोऱ्यात बटाट्याचे पीक मुबलक येते. बटाट्यासाठी चाकणची बाजारपेठ खप प्रसिद्ध आहे. 'तळेगाव बटाटा या नावाने जो बटाटा बाजारात विकला जातो, तो बराचसा ह्याच परिसरात तयार होतो. जोशींनी लावलेले सुरुवातीचे बटाट्याचे पीक उत्तम आले. सगळीकडे खूप कौतुक झाले. खेड येथील सरकारच्या बटाटा संशोधन केंद्रातील अधिकाऱ्यांनी मुद्दाम येऊन त्या शेतीची पाहणी केली. जोशी खूष झाले. शेतीवर आतापर्यंत गुंतवलेले चार लाख रुपये अशा किती हंगामांत सुटतील याची गणिते मांडू लागले. पुढच्या वेळी हौसेने पुन्हा बटाटा लावला. पण नेमका त्यावर्षी कसलातरी रोग आला आणि बटाट्याचे सगळे पीक नष्ट झाले! ही अस्मानी सुलतानी सर्वसामान्य भारतीय शेतकऱ्याच्या पाचवीलाच पुजलेली असते; पण जोशींना हा अनुभव नवाच होता. बऱ्याच वर्षांनी ह्या अनुभवाकडे वळून पाहताना जोशी म्हणाले,

 "मी बटाटा लावला होता ती जमीन आदली अनेक वर्षे पडीक होती व म्हणूनच केवळ पहिले पीक उत्तम आले होते! त्यात माझ्या प्रयत्नाचा भाग नगण्यच होता. माती, पाऊस अशा वेगवेगळ्या नैसर्गिक घटकांवर आपला शतक घडले असेल हे सांगणे त्यालाही शक्य नसते. हळूहळू माझे शेतीतले सगळेच नियोजन अयशस्वी ठरू लागले."

 पण तरीही जेव्हा इतर शेतकऱ्यांबरोबर ते बाजारपेठेत वा चावडीवर गप्पा मारायला बसत तेव्हा बाकीच्या शेतकऱ्यांना मात्र नफा होतो आहे असे संभाषणात कानावर पडत असे. हे काय गौडबंगाल आहे त्यांना कळेना. एकदा त्यांनी इतर गावकऱ्यांना गप्पा मारता मारता विचारले,

 "मघापासून मी ऐकतोय, कोणी म्हणतात, यंदा ज्वारी चांगली दहा-बारा पोती आली,

मातीत पाय रोवताना९९