पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/९७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रत्येक घरात फिरतो आणि उद्या सकाळी घरटी दोन जण तरी शंभर टक्के घेऊन येतो' असे वचन देत आपल्या गावी गेले. उरलेले पाच जण आणि जोशी स्वतः अशा सहा जणांनी दगड रचून तयार केलेल्या भिंतींच्या आडोशाला, डोंगरातून वाहणारे भणभणते वारे अंगावर झेलत, कुडकुडत कशीबशी ती रात्र काढली.

 सकाळी उठून जोशी पुन्हा कामाला लागले. या सहा जणांसह. इतर जण येतील तेव्हा येतील, असा विचार करत. पण प्रत्यक्षात दपारपर्यंत एकही नवा माणस आला नाही. गावात कोणीतरी मेल्याची बातमी तेवढ्यात कानावर आली आणि उरलेले पाच भूमिपुत्रही लगबगा गावाला निघून गेले. त्यांच्या त्या सामूहिक शेतावर आता घाम गाळायला एकटे जोशीच उरले!

 असा प्रकार वरचेवर घडू लागला. एक दिवस जोशींनी सगळ्यांना स्पष्टच विचारले,  "तुमची अडचण काय आहे? तुम्हाला शेती करायची आहे की नाही? नसेल करायची तर तसं सरळ सांगून टाका आणि मला याच्यातून मोकळं करा."

 त्यांच्या या स्पष्टोक्तीनंतर सगळे जरा गांगरले. "असं नका हो करू. तुम्ही गेलात तर सगळंच कोसळेल. आमचं नाक कापलं जाईल आणि तो मूळ जमीन मालक आम्हाला जगूही देणार नाही. जरा बेताबेताने घेऊ या." वगैरे म्हणत सारवासारव करू लागले. पण त्यात फारसा काही अर्थ नव्हता हे एव्हाना जोशींना कळून चुकले होते. या प्रकरणात त्यांच्या स्वतःच्या पदरचे दोन हजार रुपये खर्च करून झाले होते. ते बुडीत खाती गेले आहेत हे स्पष्ट होते.

 या अकरा जणांपैकी एकालाही जमीन कसण्याची आणि कष्ट करण्याची इच्छा नव्हती. बिगरशेती उत्पन्नाचे साधन असतानाही भूमिहीन म्हणून नावे नोंदवून त्यांनी जमीन मिळवली होती. जोशींसारख्या शहरी माणसापुढे भूमिहीनतेचे करुण नाटक त्यांनी उत्तम वठवले होते; पण गावकऱ्यांसमोर त्यांचे नाटक चालत नव्हते.

 मुळात त्यांना स्वतः कष्ट करून जमीन कसायचीच नव्हती; पुढेमागे एखादा खरीददार सापडला तर त्या जमिनी विकून दोन पैसे करायचे एवढेच त्यांचे उद्दिष्ट होते. तसे केल्यानंतर पुन्हा नव्याने एखाद्या सरकारी योजनेत जमीन मिळवायला ते मोकळे होणार होते! ह्या कहाणीचा समारोप करताना जोशी लिहितात,

पण ह्यात त्यांचे कुठेच चुकत नव्हते. चुकत माझेच होते. बँकेच्या कर्जाचे प्रकरण करतानाच माझ्या लक्षात आले होते, की विहिरीचा खर्च करून, पाण्याची सोय करून, शेती करायची म्हटले, तर कोणतेही पीक काढले तरी बँकेच्या कर्जाची परतफेड यावज्जन्म शक्य नव्हती. दरवर्षी चांगले पीक येईल असा हिशेब केला, तरी खर्च फिटत नव्हता. ही काय गंमत आहे याचा उलगडा मला त्यावेळी झाला नव्हता. गावकऱ्यांना ते कळले होते, भूमिपुत्रांनाही ते कळले होते; पण ते मला सांगत नव्हते. हे सर्व समाजव्यवस्थेचे गुह्यतम गुह्य आणखां उग्र तपस्येने माझे मलाच शोधावे लागणार होते.

मातीत पाय रोवताना९७