पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/९६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सरकारी अधिकाऱ्यांसमोर ते उत्साहाचे केवळ नाटक व तेही अगदी अहमहमिकेने करत होते. बँकेकडून कर्ज मिळावे म्हणून स्वतः जोशी यांनीच खेड या तालुक्याच्या गावी अनेक खेटे घातले. त्यांच्याबरोबर अकरापैकी फक्त एकच भूमिपुत्र सोबत म्हणून बँकेत आला; बाकीच्या सगळ्यांनी घरी काही ना काही काम आहे अशी सबब सांगून स्वतः येणे टाळले. पण तरीही जोशींनी मनात कटुता येऊ दिली नाही. 'आपल्यावर त्यांनी विश्वास ठेवावा असे आपण प्रत्यक्षात काय करून दाखवले आहे? त्यांचा निरुत्साह अगदी समजण्यासारखा आहे. जसजसे काम उभे राहील तसतसा त्यांचा विश्वास वाढेल' - असे जोशी स्वतःला समजावत राहिले. त्यांनी लिहिले आहे, एकोणिसाव्या शतकातील मिशनऱ्यांच्या धाटणीवर मी स्वतःलाच धीर देत होतो." (मिशनऱ्यांच्या मनोभूमिकेचे त्यांनी इतके चपखल बसणारे उदाहरण द्यावे हे नवलच आहे. कदाचित त्यांनी केलेल्या सॉमरसेट मॉमच्या वाचनाचा हा प्रभाव असावा.)

 जमीन डोंगरकपारीत उतारावर होती; त्यामुळे बांधबंदिस्तीचे बरेच काम करणे आवश्यक होते. त्यासाठी ह्या भूमिहीनांकडे पैसे नव्हते. ह्या प्रकरणात जोशी घेत असलेल्या पुढाकारामुळे स्थानिक सरकारी अधिकारी बरेच प्रभावित झाले होते. एव्हाना जोशी यांची पार्श्वभूमी त्यांच्याही कानावर आली होती. ते म्हणाले, “सामानाचा सगळा खर्च कुठल्यातरी शासकीय योजनेखाली आम्ही करू. पण आमची एक अट आहे. मजुरीचा बंदोबस्त मात्र नवभूधारकांनी केला पाहिजे."

 जोशी आनंदाने तयार झाले. लगेच दावडीला आले. सगळ्यांना गोळा केले व त्यांच्यापुढे त्यांनी ही योजना मांडली - तीन दिवसांनी सगळ्यांनी शेतीवर राहायलाच जायचे. बांधबंदिस्तीचे काम पूर्ण होईस्तोवर तिथेच राहायचे. प्रत्येक घरातून निदान दोन जण तरी आले पाहिजेत. आपले महत्त्वाचे काम त्यामुळे होऊन जाईल. प्रारंभीची एक मोठी अडचण दूर होईल. शिवाय, विशेष इन्सेंटिव्ह म्हणून, जे हजर राहतील त्यांना सध्याच्या दराप्रमाणे मजुरीही मिळेल. आणि जे गैरहजर राहतील त्यांना मात्र दंड केला जाईल.'

 व्यवस्थापनशास्त्राप्रमाणे ह्यात चांगले काम करणाऱ्याला गाजर आणि कामात हयगय करणाऱ्याला छडी' अशी तजवीज जोशींनी केली होती. सगळ्यांनी होकारार्थी माना डोलावल्या.

 ठरलेल्या दिवशी सकाळी उजाडता उजाडताच जोशी पुण्याहून निघून दावडीला गेले. तिथे एकही व्यक्ती हजर नव्हती! तास-दोन तास बरीच खटपट केल्यावर आणि निरोपानिरोपी केल्यावर चार घरांमधली मिळून एकूण नऊ माणसे हाती लागली. त्यांना आपल्या जीपमध्ये घालून जोशी शेतावर घेऊन गेले. मिळतील तेवढे दगडगोटे गोळा करून रात्रीच्या आडोशासाठी भिंती उभ्या करायला सुरुवात केली. जोशी स्वतःही अंग मोडून कामाला लागले. संध्याकाळी सगळ्यांनी कंदिलाच्या उजेडात भाकऱ्या खाल्ल्या.

 तो सगळाच अनुभव जोशींना विलक्षण रोमांचक वाटत होता. भारतात परतल्यावर प्रथमच आपण थोडेफार अर्थपूर्ण जगतो आहोत असे वाटत होते. जेवण झाल्यावर दोघे जण काहीतरी अडचण सांगून आपल्या घरी निघून गेले. दुसरे दोघे "आम्ही आत्ता गावात जातो,

९६अंगारवाटा... शोध शरद जोशींचा