पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/८७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शेंबेकरांच्या मनात किती सच्चाई आणि कळकळ होती ते कळायला मला दहा वर्षे लागली. त्यांचा तेवढा एक अपवाद सोडला तर शेतीच्या प्रयोगात मला सल्ला देण्याचा किंवा मी काय करतो आहे ते समजून घेण्याचा उपद्व्याप करणारे इतर कोणीच आले नाहीत.

 आल्याआल्याच जोशींनी किर्लोस्कर कन्सल्टंट्स या प्रसिद्ध कंपनीला सल्लागार म्हणून नेमले होते; योग्य ती शेतजमीन शोधून देण्यासाठी. उगाच इकडच्या तिकडच्या ओळखीवर अवलंबून राहण्यापेक्षा प्रत्येक गोष्ट व्यावसायिक तत्त्वावर करण्याची त्यांची इच्छा होती. कंपनीच्या वतीने एका अधिकाऱ्यावर हे काम सोपवले गेले. पण त्या सल्लागाराचाही फारसा उपयोग होत नव्हता. यवत व उरळीकांचन येथे काही सुपीक विकाऊ जमिनी त्यांनी दाखवल्या; जोशींनी त्यांतली एखादी जमीन खरेदी करावी असा त्यांचा सल्ला होता. अशा भेटींच्या वेळी बहुतेकदा लीलाताईदेखील बरोबर असत. 'उसाच्या शेतीतदेखील हवे ते प्रयोग आपण करू शकू. शिवाय, त्यात धोका कमी आहे. आपल्याला आता केवळ शेतीवरच उदरनिर्वाह करायचा आहे, तेव्हा जिथे चार पैसे सुटायची थोडीतरी शक्यता आहे, तीच जमीन का खरेदी करू नये?' असे त्यांचे म्हणणे. पण जोशी आपल्या निर्णयापासून जराही हटायला तयार नव्हते.
 शेवटी एकदाची हवी होती तशी कोरडवाहू शेतजमीन जोशींना मिळाली. त्या मागेही एक योगायोगच होता. एक निवृत्त पोलीस इन्स्पेक्टर जोशींच्या ओळखीचे झाले होते. त्यांनी त्यांच्या एका मित्राची जोशींबरोबर ओळख करून दिली. पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील चाकण ह्या गावापासून सात किलोमीटरवर आंबेठाण नावाचे एक छोटे खेडे होते. ह्या मित्राची तिथे जमीन होती, पण त्यांनी वेळोवेळी बँकेकडून घेतलेल्या कर्जापोटी ती गहाण पडली होती. खूप तगादा लावूनही त्यांच्याकडून कर्ज फेडले जात नसल्याने शेवटी बँकेने जमिनीचा लिलाव करायचे ठरवले होते. या परिस्थितीत काही मार्ग निघतो का, हे बघायला ते जोशींकडे आले होते.
 जोशींची ती जमीन प्रत्यक्ष बघायची इच्छा होती व त्यानुसार दुसऱ्याच दिवशी दोघे तिथे गेले. वाटेत त्यांच्या बऱ्याच गप्पा होतच होत्या. त्यांचा मोकळाढाकळा स्वभाव जोशींना आवडला व त्याच दिवशी बँकेचे एकूण जितके कर्ज थकले होते. तेवढे पैसे जोशींनी त्यांच्या बँकेत रोख भरले व त्यांची जमीन लिलावापासून वाचवली.
 पण तेवढ्याने त्यांची पैशाची गरज भागणार नव्हती. कारण आता दुसऱ्या काही कामासाठी त्यांना पुन्हा पैशांची गरज होती. पुन्हा एकदा जोशींनी त्यांना रोख पैसे कर्जाऊ दिले. असे दोन-तीनदा झाले. ते शेतकरी बँकेच्या कर्जातून मुक्त झाले, तरी आता जोशींचे बरेच पैसे त्यांच्याकडे थकले होते व ते परत मिळायची काही लक्षणे दिसेनात. जोशींच्या कर्जातून मुक्त होण्यासाठी म्हणून शेवटी त्यांनी आपली ती जमीनच जोशींना विकायचे ठरवले.

 प्रत्यक्ष व्यवहार करण्यापूर्वी एकदा ती जमीन नीट पारखून बघावी, ह्या उद्देशाने जोशी

मातीत पाय रोवताना८७