पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ह्या उताऱ्यावरूनही त्यांचे एकूण पोस्टाबद्दलचे मत स्पष्ट होते.
 व्यक्तिगत पातळीवर विचार केला तर, या नोकरीत सुरक्षा होती, पगार व सर्व सोयी चांगल्या होत्या, हाती अधिकार होता, समाजात मान होता; पण तरीही अधिकारपदाची नवलाई सुरुवातीच्या तीन-चार वर्षांत ओसरल्यानंतर ह्या नोकरीत त्यांचा जीव रमेनासा झाला होता. एक प्रकारचे साचलेपण जाणव लागले होते. आपल्या हातून काहीतरी भव्यदिव्य व्हावे, ही लहानपणापासूनची तीव्र आस अपुरीच राहिली होती; भविष्यातही ती पूर्ण व्हायची इथे काही शक्यतादेखील दिसत नव्हती. ह्या नोकरीचा राजीनामा द्यावा असा विचार त्यांच्या मनात साधारण १९६४-६५नंतर येऊ लागला; पण समोरचा रस्ता दिसत नव्हता.

 तो रस्ता सात महिन्यांच्या पॅरिसभेटीत दिसू लागला. भारत सोडून परदेशात कुठेतरी नोकरी धरावी, तिथल्या नोकरीत कदाचित आपल्याला काहीतरी आव्हानात्मक जाणवेल, आपल्या कर्तृत्वाला काही नवे धुमारे फुटतील असे वाटू लागले.
 या काळात जगभरच्या पोस्टखात्यांतील इतरही अनेक अधिकारी जोशींना भेटले. त्यांच्यातल्याच एकाकडून त्यांच्या बर्न येथील मुख्य कार्यालयात एक नवीन पोस्ट तयार होते आहे व ती आपल्याला मिळण्यासारखी आहे असे त्यांना कळले. त्यासाठी जोशींनी तिथे असतानाच प्रयत्न केला व ती नोकरी त्यांना मिळेल हे साधारण ठरले.
 हे आयटीच्या खूप आधीचे दिवस होते. परदेशात नोकरी करणे तितकेसे सोपे वा रूढ नव्हते. त्याचबरोबर भारतातली कायमस्वरूपी, दहा वर्षे पूर्ण झालेली, उत्तम सरकारी नोकरी सोडणे धाडसाचेच होते. आत्ता राजीनामा दिला तर फंड व ग्रॅच्युइटी मिळेल, पण पेन्शनवर पाणी सोडावे लागेल, तसेच या सरकारी नोकरीत क्लेमदेखील राहणार नाही, हे त्यांना ठाऊक होते. शिवाय आधी भारतातल्या नोकरीचा राजीनामा दिल्याशिवाय तिथली नोकरी मिळणार नाही हेही त्यांना स्पष्ट सांगण्यात आले होते.
 पण 'बिकट वाट हीच वहिवाट' बनवण्याचे धाडस जोशींनी पूर्वीही आपल्या आयुष्यात केले होतेच, त्यांचे ते पराकोटीचे आत्मभान - मनात येईल ते बिनदिक्कत कुठल्याही अडचणींवर मात करून आपण करू शकतो ही जिद्द, पुन्हा एकदा उसळी खाऊ लागली.
 भारतात ते परतले त्याच आठवड्यात त्यांनी इथल्या सरकारी नोकरीचा तडकाफडकी राजीनामा देऊनही टाकला. सगळी कार्यालयीन औपचारिकता पूर्ण होईस्तोवर महिना गेला. त्यांचा राजीनामा हा तसा धक्कादायकच होता; पण जोशींचा निर्धार पक्का होता.
 ३० एप्रिल १९६८ हा त्यांच्या भारतातील नोकरीचा शेवटचा दिवस. त्याच रात्री युपीयुमधील नोकरी स्वीकारण्यासाठी त्यांनी स्वित्झर्लंडला प्रयाण केले.

५८अंगारवाटा... शोध शरद जोशींचा