पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मानला जातो. या सगळ्याचे पडसाद जोशींसारख्या विचारी स्वभावाच्या व्यक्तीवर नक्कीच उमटले असणार, पण त्याची नोंद अशी आपल्याला कुठे सापडत नाही.
 तत्कालीन निदर्शनांचा एक भाग म्हणजे फ्रान्समधील शेतकरी आपल्या मागण्या रेटण्यासाठी वारंवार करत असलेले 'रास्ता रोको' आंदोलन. प्रा. जी. आर. दीक्षित यांच्या एका पत्राचा उल्लेख मागील प्रकरणात झाला आहे. शरद जोशींनी आपल्या आंदोलनात ज्या 'रास्ता रोको' तंत्राचा वापर केला याचा उल्लेख करताना ते लिहितात, “कधी कधी मला असं वाटतं, की तुम्ही शेतकऱ्यांच्या चळवळीचा 'रास्ता रोको' पद्धतीचा जो अनुभव घेतला, तो तुमच्या फ्रान्समधील वास्तव्यात."
 ह्यात थोडेफार तथ्य असावे. कारण अशा प्रकारचे 'रास्ता रोको' हे फ्रान्समधील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे एक वैशिष्ट्य होते. जोशींच्या भावी आयुष्यातील काही कृत्यांचा धागा फ्रान्समधील त्या वास्तव्यात बघितलेल्या अशा काही प्रसंगांशी जोडलेला असणे अशक्य नाही. किंबहुना, अन्यथा त्यांच्यासारखा एखादा माजी सनदी अधिकारी, विदेशात उच्चपदी राहिलेला विचारवंत, एकाएकी एका छोट्या गावातील, छोट्या आंदोलनात भर रस्त्यावर मांडी ठोकून वाहने अडवायला बसतो हे समजून घेणे तसे अवघडच आहे.
 एक लक्षणीय बाब म्हणजे, त्यांनी पॅरिसमध्ये असताना हिरव्या शाईत लिहिलेली सोळा A4 आकाराची हस्तलिखित पाने उपलब्ध आहेत. डाव्या कोपऱ्यात 'पॅरिस, १९६७, फेब्रुवारी' असे लिहिलेले आहे. म्हणजे ह्या भेटीच्या आधी पॅरिसला दिलेल्या एखाद्या भेटीत हे लेखन केलेले असावे. पहिल्याच पानावरील मजकुरात "Theory of Revolutions' हे शब्द आहेत. म्हणजे बहुधा ह्याच शीर्षकाचे जे एक पुस्तक त्यांना लिहायचे होते व सोळाव्या प्रकरणात ज्या पुस्तकाचा उल्लेख आहे त्याचीच हे लेखन म्हणजे सुरुवात असावी. वाचताना हा मजकूर खूप मूलगामी स्वरूपाचा आहे हे जाणवते. त्यात जोशी लिहितात :

इतिहासात वेगवेगळ्या क्रांत्या झाल्या, अनेक प्रकारे उत्क्रांती होत गेली, अनेक संस्था निर्माण झाल्या. हे सारे बदल कोणा महापुरुषांमुळे घडून आले, की कुठल्यातरी अनाकलनीय अशा वैश्विक प्रेरणांमुळे? विशिष्ट कालखंडात एखादा बुद्ध, एखादा जिझस, एखादा अॅडम स्मिथ, एखादा मार्क्स, एखादा फोर्ड, एखादा गांधी का निर्माण होतो? हे महापुरुषांचे जन्म हा केवळ एक ऐतिहासिक अपघात असतो का? त्यांच्यामुळे परिस्थिती बदलते, का त्यांचा जन्म त्या परिस्थितीत अपरिहार्य असतो? या साऱ्यांना जोडणारे एखादे मूलतत्त्व असेल का? सगळेच मूलतत्त्ववादी (fanatics) म्हणजे फसलेले प्रेषित (prophets) असतात का? आणि सगळेच प्रेषित हे फसलेले मूलतत्त्ववादी असतात का? एखाद्या महात्म्याला समाजमान्यता मिळते आणि एखाद्याला ती मिळत नाही, हे कशामुळे घडते?

व्यावसायिक जगात५५