शेवटच्या वर्षभरात त्यांची प्रकृती अधिकाधिक खालावत गेली होती. त्या अवस्थेतून ते कधी नीटसे उठलेच नाहीत. शेवटी त्यांना पुण्याच्या रुबी हॉलमध्ये दाखल केले गेले. गेल्या काही वर्षांत अनेकदा ते तिथे जाऊन-येऊन होते. सुप्रसिद्ध डॉ. दुराई राज यांच्या प्रमुख देखरेखीखाली. अगदी शेवटी प्रोस्टेट कॅन्सरचे निदान झाले. पण तोवर खूपच उशीर झाला होता.
या शेवटच्या खेपेला ते महिनाभर तिथे होते. 'आमच्या उपचारांमुळे आता फारसा काही फरक पडण्यासारखा नाही, तेव्हा तुम्ही त्यांना घरी नेलेत तरी चालेल,' असे तेथील डॉक्टरांनी सांगितल्यावर सारासार विचार करून त्यांच्या निकटवर्तीयांनी १ डिसेंबर रोजी त्यांना बोपोडीला घरीच आणायचा निर्णय घेतला. अखेरच्या आजारपणात दोन्ही कन्या भारतात येऊन गेल्या होत्या. अर्थात त्यांनाही त्यांचे त्यांचे संसार होतेच. दैनंदिन सांभाळ मुख्यतः दीदी, अनंतराव देशपांडे व सुरेशचंद्र म्हात्रे ह्यांनीच केला. आपल्या नेत्याला त्यांनी दिलेली इमानी, प्रेमाची आणि पूर्णतः निरपेक्ष साथ ही खरोखरच थक्क करणारी होती.
९ डिसेंबरला, बुधवारी, सकाळी नऊ-साडेनऊच्या सुमारास मी व बद्रीनाथ देवकर त्यांना भेटायला गेलो. खोलीत प्रवेश करताच वातावरणातले गांभीर्य जाणवले होते. काही न बोलता आत बेडरूममध्ये गेलो. पलंगावर पडल्यापडल्या ते सारखे कण्हत होते, मधूनच 'झोंबतं आहे' असे बोलत होते. हा औषधांचा परिणाम असावा. त्यांच्या डोळ्यांत आम्हांला बघितल्यावर ओळख उमटली, पण संभाषण अर्थातच अशक्य होते. काही मिनिटे आम्ही पलंगाशेजारीच उभे राहिलो. पण त्यांच्या वेदना आम्हाला बघवेनात. डोळे पाणावले. गतकाळातले त्यांचे तेजस्वी रूप डोळ्यापुढे येऊन दुःखाचे कढ येत होते. डोळे पुसत आणि हुंदका आवरत आम्ही त्यांच्या बेडरूममधून बाहेर आलो. हॉलमध्ये येऊन बसलो. त्यांना सांभाळणारा आनंद नावाचा एक मुलगा तेवढा बेडरूममध्ये थांबला. जवळजवळ दोन तास आम्ही तिथेच होतो. दीदी, अनंतराव व म्हात्रेही तिथे होते. सगळे तसे गप्पगप्पच होतो. बोलण्यासारखे काही नव्हतेच उरलेले. क्वचित कधी होणाऱ्या संभाषणात 'कधी थांबणार हे सारं' हाच अव्यक्त सूर होता.
१२ डिसेंबरला, शनिवारी, सकाळी साडेनऊच्या सुमारास मला बद्रीनाथांचा फोन आला. "सकाळी नऊ वाजता साहेब गेले." काही क्षण काय बोलावे तेच सुचेना. सुन्न झालो. एका अर्थाने ते सुटले असे वाटत होते व त्याचवेळी एक खूप मोठा माणूस हे जग सोडून गेला ह्याची जाणीवही प्रकर्षाने होत होती. मुली अमेरिकेतून परत आल्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार झाले. बातमी लागताच गावोगावाहून धावून आलेल्या १५,००० शेतकरी बांधवांच्या साक्षीने वैकुंठावर दहन झाले.
एक पिंड ब्रह्मांडात विलीन झाला.
शेतकरी संघटना हा आता विझलेला निखारा समजायचा का? भावी पिढ्यांसाठी शरद
पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५१५
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
सांजपर्व ◼ ४९१