पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 पोस्टाच्या कार्यपद्धतीनुसार पहिली दोन वर्षे ते प्रोबेशनवर होते. ह्या दोन वर्षांत त्यांनी गुजरातेत बडोदे व सुरेंद्रनगर येथे, उत्तर प्रदेशात सहरनपूर येथे आणि महाराष्ट्रात रत्नागिरी व मंबई येथे काम केले. प्रत्येक ठिकाणी साधारण चार-पाच महिने. पत्रांचे वितरण करणे हा पोस्टाच्या कामाचा केवळ एक भाग झाला. पण पोस्टखाते इतरही अनेक गोष्टी सांभाळत असते. मनीऑर्डरद्वारे देशभरात कुठेही पैसे पोचवणे, अल्पबचत विभाग, बचतखाते, खूप मोठा कर्मचारी वर्ग, जागोजागी असलेली प्रॉपर्टी. त्याकाळी तार (टेलेग्राफ) खातेही महत्त्वाचे होते व तेही पोस्टखात्याचाच भाग असायचे. एकूणच पोस्टाचा व्याप अफाट असतो. इथल्या कामाशी त्यांचा तसा साधारण परिचय होताच, पण प्रोबेशनवर असताना अधिक बारकाईने ओळख झाली. विशेष म्हणजे, एकूण देशाचीही व्यापक ओळख झाली.

 प्रोबेशन संपल्यावर जलै १९६० मध्ये त्यांची पहिली नेमणक झाली ती मंबईत डेप्युटी डायरेक्टर, फॉरिन पोस्ट या पदावर. डॉकयार्ड रोड येथे त्यांचे हे पहिले ऑफिस होते. नोकरीत रुबाब खूप होता. मोठे थोरले ऑफिस. पहिल्या नेमणुकीतच हाताखाली ५०० कर्मचारी. बेल दाबली की कोणीतरी लगेच हजर होणार. मर्जी सांभाळण्यासाठी सगळे कनिष्ठ अहमहमिकेने झटणार. आपल्या देशात उच्च शासकीय सत्तेचे एक वलय असतेच; त्या काळात तर ते खूपच अधिक होते. ते वलयांकित अस्तित्व कोणालाही त्या तरुण, उमेदीच्या वयात सुखावणारे होते.

 सर्वसामान्य कुटंबीयांप्रमाणे त्यांच्याही घरी नोकरीपश्चात लग्नाचा विषय आपोआपच निघू लागला. २५ जून १९६१ रोजी त्यांचे लग्न झाले. १९४३मध्ये जन्मलेल्या लीला कोनकर दिसायला देखण्या, सडपातळ, हुशार होत्या. दाखवण्याचा पारंपरिक कार्यक्रम झाला त्याचवेळी जोशींनी त्यांना पसंत केले होते; पण तेव्हा त्यांचे वय अवघे १७ होते. त्यामुळे एक वर्ष थांबायचे ठरले. प्रत्यक्ष लग्नाच्या वेळी त्या ज्युनिअर बीएच्या वर्गात होत्या. पतीपेक्षा आठ वर्षांनी लहान, म्हणजे जेमतेम अठरा वर्षांच्या. मुंबईत शिवाजीपार्क-माहीम येथील लेडी जमशेदजी रोडवरच्या रामबागमध्ये आईवडलांसह राहत होत्या. कॅम्लिन ह्या शाई, रंग व इतर स्टेशनरी बनवणाऱ्या प्रख्यात कंपनीचे मालक दांडेकर ह्यांच्यामुळे प्रसिद्ध असलेली ती इमारत. जोशी म्हणतात, "चारचौघांप्रमाणेच रीतसर दाखवून, ठरवून झालेले हे लग्न. माझ्या निरीश्वरवादामुळे विवाह कोणताही धार्मिक विधी न करता झाला एवढेच काय ते तत्कालीन समाजापेक्षा वेगळेपण."

 दोघांनी मधुचंद्र उत्तर प्रदेशात मसूरी येथे साजरा केला. तिथून जोशी पुण्याला परत आले व कामावर रुजू झाले. मार्च महिन्यातच त्यांची इथे बदली झाली होती. सिनिअर सुपरिटेंडंट ऑफ रेल्वे मेल सर्व्हिस, बी डिव्हिजन, पुणे, या पदावर. ते मसूरीहून परतले आणि लगेचच १२ जुलै १९६१ रोजी, पुण्यात पानशेत धरण फुटून प्रचंड हाहाकार उडाला. पोस्टखातेही त्याला अपवाद नव्हते. अनेक पोस्ट ऑफिसेसमध्ये पाणी घुसले होते, हजारो पत्रे भिजून त्यांचा लगदा झाला होता. बहुतेक ठिकाणी कर्मचारी कामावर यायच्या परिस्थितीतही नव्हते. जोशी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी अतिशय जिद्दीने सगळ्याला तोंड दिले.

व्यावसायिक जगात५१