पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हे कठीण आहे. महाकठीण आहे. आज शहराच्या नवलाईच्या दर्शनाने आपण सुखावलो आहोत; आपल्या विद्येकरिता गावाकडे मायबाप काय उस्तवारी करत आहेत, याचासुद्धा विसर पडतो. त्यांची इच्छा एकच – पोराने परीक्षा द्यावी, पास व्हावं, नोकरी धरावा, घरशेता कर्जातून सोडवावा आणि हे पाहून त्यांना सुखानं डोळे मिटावेत. पण शेतकऱ्यांच्या पोरांना शहरातील परीक्षा द्यायला सांगणं म्हणजे हत्तीला दोरीवरच्या उड्या मारायला सांगणं आहे. जमावं कसं?...

लाखात एखाद्याच शेतकऱ्याच्या पोराला मिळणारी विचार करण्याची, अभ्यास करण्याची संधी तुला मिळाली आहे. ती किमान या एका प्रश्नाचं उत्तर शोधून काढण्यासाठी वापर. माझ्या आईबापांनी असं कोणतं पाप केलं होतं, की त्यांना असं चिखलात झिजत राबावं लागतं? त्यांच्या श्रमाचं मोल त्यांना का मिळालं नाही? त्यांच्या घामाचं दाम कोणत्या हरामानं हिरावून नेलं?'...

मोहनदास करमचंद गांधी इंग्लंडच्या ऐश्वर्याला भुलून काही काळ साहेब बनण्याच्या प्रयत्नाला लागले; पण त्यांनी स्वतःला सावरलं आणि स्वातंत्र्याचे प्रणेते, राष्ट्रपिता झाले. ते स्वतः इंग्लंडमधल्या सुखात रममाण झाले नाहीत. तुझ्या मायबापांना लुटणाऱ्यांच्या वैभवात बोटं घालून त्यात धन्यता मानण्याचा मोह पडू देऊ नकोस.... आजची तुझी स्थिती सीतेच्या शोधासाठी गेलेल्या हनुमानासारखी आहे. लंकेचे वैभव, प्रासाद, तलाव, बागबगीचे पाहून हनुमानही विस्मयचकित झाला. पण त्या भिकारड्या रामाची कसली भक्ती करता; या अजिंक्य, महाबलाढ्य रावणाच्या ऐश्वर्याचा उपभोग घेऊ, असा विचार त्याच्या मनाला शिवलाही नाही. अशोकवनातील विरहदुःखी सीतेचा शोध त्याने चालू ठेवला म्हणून रामायण घडले.

आज भूमिकन्या सीता पुन्हा वनवासात आहे. आम्ही भूमिपुत्र तिच्या विमोचनाच्या कामाला लागणार, का लंकेश्वर रावणाच्या वैभवाचे वाटेकरी व्हायला बघणार, हा प्रश्न तुझ्यापुढे ठेवण्यासाठी हा पत्राचा प्रपंच. (प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश, भाग-२, प्रथमावृत्ती, डिसेंबर १९८५, पृष्ठ ११४-१२०)

 शेतकरी संघटनेच्या उभारणीच्या दिवसांत ग्रामीण भागातील नव्याने शिकू लागलेला तरुणवर्ग ह्या पत्ररूपी लेखाने अक्षरश: भारावून गेला होता. अनेकांनी आपापल्या खोलीच्या भिंतीवर पत्राची प्रत चिकटवली होती. हे संपूर्ण पत्र वाचल्यानंतर गावोगावी शिकणाऱ्या हजारो शेतकरी कुटुंबातील मुलांच्या डोळ्यात पाणी उभे राहायचे; पण त्याचवेळी त्यांची मनेही आपल्यावर पिढ्यान्पिढ्या होत असलेल्या अन्यायाच्या जाणिवेने पेटून उठायची. पुढे शेतकरी संघटनेचा विचार एखाद्या वणव्याप्रमाणे ग्रामीण तरुणांमध्ये पसरला, ह्याचे थोडेफार श्रेय ह्या काळजाला हात घालणाऱ्या पत्रालाही नक्कीच द्यावे लागेल.

व्यावसायिक जगात४७