पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४. समाजव्यवस्थेचे फोल प्रयत्न

व्यक्ती कितीही अनन्यसाधारण असली तरी तिला समाजात राहावे लागते, वस्तूंची आणि सेवांची देवघेव करावी लागते. त्यासाठी विविध प्रकारची सत्तास्थाने आवश्यक असतात. पण सत्ता आला की भ्रष्टाचार आला. कारण, सत्ता निसर्गविपरीत आहे. सत्तेशिवाय चालत नाही आणि सत्तेने सगळे काही बिघडते हा मनुष्यजातीला पुरातन काळापासून पडलेला पेच आहे. भ्रष्टाचार आणि सत्तास्पर्धा टाळण्यासाठी इतिहासात अनेक प्रयोग झाले. माणसाची कामे जन्माच्या आधारानेच ठरावीत आणि त्यात प्रत्येकाने संतोष मानावा, अशी व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न झाला. समाजाला स्वतःच्या सामर्थ्याप्रमाणे देणारा आणि केवळ आपल्या गरजेपुरतेच घेणारा उदात्त समाजवादी माणूस तयार करण्याचेही प्रयत्न झाले. हातातील सत्ता-संपत्ती विश्वस्ताच्या निरिच्छेने हाताळली जावी अशी गांधीवादी नैतिकतेची कल्पना पुढे मांडण्यात आली. पण, हे सगळे प्रयत्न फसले. माणसाची गुणवत्ता सुधारण्याचे महात्म्यांनी सांगितलेले मार्ग निसर्गाला रुचत नाहीत असे दिसते. श्रेष्ठत्व आणि गुणवत्ता म्हणजे काही एक ठरावीक प्रकारची भूमिका हे निसर्गाला मान्य नाही. ठोकळेबाज पुरुषार्थाच्या कल्पना निसर्गाला मान्य नाहीत. सत्तेची दुष्टता संपवण्याचा एकच मार्ग म्हणजे सत्ताकेंद्रांची विविधता आणि त्यांच्यातील स्पर्धा. सत्ताकेंद्र म्हणजे काही फक्त राजधानीतील केंद्र नाही. प्रत्येक माणूस आपापल्या जागी काही प्रमाणात तरी सत्ता गाजवतच असतो. कोणाचीही सत्ता निरंकुश नको, त्याला स्पर्धा पाहिजे; तरच दुष्टता आटोक्यात राहण्याची काही आशा असते.

५. स्पर्धा
स्पर्धा हे जगातील चैतन्याचे रहस्य आहे. स्पर्धा हा प्रशिक्षणाचा सगळ्यात प्रभावी आराखडा आहे. स्पर्धेत उतरल्याने स्पर्धा करण्याची शक्ती वाढते; जसे, पाण्यात उतरल्यानेच पोहोता येते, मूल पडतापडताच चालायला शिकते.
६. जोपासना दुर्बलांची
या उलट संरक्षणाने, देणाऱ्याचे भले होत नाही, ना घेणाऱ्याचे. व्यक्तींच्या विविधतेत काही दुर्बल घटक असणारच. लहान मुले, मतिमंद, अपंग हेदेखील समाजाचे घटकच आहेत. स्पर्धेबरोबरच दुर्बलांच्या जोपासनेचे सूत्र महत्त्वाचे आहे; पण जोपासना अपंगत्व वाढवणारी, विकासाची इच्छा खुंटवणारी नको. हातपाय नसलेल्यांना जागतिक खेळांच्या स्पर्धेत भाग घेता येणार नाही, पण त्यांची त्यांची स्वतंत्र खेळांची स्पर्धा असू शकते. अपंग आणि सुदृढ यांचे सगळ्यांचे मिळून एकत्रच खेळ झाले पाहिजेत असा कोणी आग्रह धरला, तर ते कोणाच्याच भल्याचे नाही; ना सुदृढांच्या ना अपंगांच्या.
७. व्यक्तिविकास हाच समाजविकास

व्यक्तीच्या विकासाच्या धडपडीतून समाजाचा, राष्ट्राचा विकास होतो. विकास निसर्गसिद्ध आहे, गरिबी निसर्गविपरीत आहे.

४२८अंगारवाटा... शोध शरद जोशींचा