पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कामासाठी फायदा करून घेण्याचे दिवस आता संपले होते.
 काही अखिल भारतीय स्वरूपाची कामे दिल्लीत राहून करणे त्यांना अधिक सुलभ गेले. ह्या कालावधीत किसान समन्वय समितीच्या कामासाठी त्यांना अधिक वेळ देता आला. वेगवेगळ्या राज्यांतील किसाननेते काही ना काही कारणांनी दिल्लीत येत असत; त्यांच्याशी असलेला जोशींचा संबंध अधिक घनिष्ठ झाला. World Agriculture Forum (जागतिक कृषी मंच) ह्या आंतरराष्ट्रीय शेतकरी संघटनेचे कामही दिल्लीत राहून त्यांना बरेच करता आले. शेतीविषयक चर्चा करणारा हा एक आंतरराष्ट्रीय मंच असून त्याची स्थापना १९९७मध्ये झाली. युनायटेड स्टेट्समधल्या मिसूरी ह्या शेतीप्रधान राज्यातील सेंट लुईस शहरात त्याचे मुख्यालय आहे. दर दोन वर्षांनी भरणाऱ्या त्याच्या परिषदेस जोशी दोन वेळा गेले होते. जागतिक स्तरावर शेतीसंदर्भात काय काय घडत आहे ह्याची माहिती त्यातून त्यांना मिळत असे. मंचाच्या सल्लागार समितीचे ते एक सदस्यही होते. त्याची एक शाखा भारतातही काढायचा त्यांनी प्रयत्न केला होता, पण त्याला फारसे यश आले नाही. दिल्लीतील वास्तव्याचे असे काही फायदे झाले.

 पण त्याचबरोबर या कालावधीत महाराष्ट्रातील जुन्या सहकाऱ्यांपासून ते काहीसे दूर गेले. पूर्वी ते अनेकांच्या घरी जात, खूपदा मुक्कामही करत, हास्यविनोदात, चर्चेत आनंदात वेळ जाई. दिल्लीत कोणाशीच त्यांची तशी जवळीक प्रस्थापित झाली नाही. दिल्लीतील एकूण संस्कृतीही खूप वेगळी होती. जवळ जाऊनही दिल्ली त्यांच्यापासून तशी दूरच राहिली. शेतकरी संघटना हेच त्यांचे कुटुंब होते. त्यांच्यासमवेत होणारी विचारांची व सुखदुःखांची देवाणघेवाण लांब गेल्यावर काहीशी खंडित झाली. 'साहेब सहा वर्षे दिल्लीत राहिले व आमच्याशी असलेला त्यांचा संबंध खूपच कमी झाला, याची खंत शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकत्यांनी प्रस्तुत लेखकाशी बोलताना व्यक्त केली होती.

 






राष्ट्रीय मंचावर जाताना३७३