पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कालवे बांधून तयार असतील, तर त्यांचा वापर करून पाण्यासाठी तहानलेल्या जमिनीला व लोकांना पाणी पुरवले पाहिजे.
 आपल्या भाषणात जोशी म्हणाले,
 "काही लोक म्हणतात, की ह्या धरणाचं पाणी सौराष्ट व कच्छच्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोचणारच नाही. मी म्हणेन, की मदर तेरेसा रस्त्यावर पडलेल्या जखमी माणसाला उचलून इस्पितळात घेऊन जात, तेव्हा त्या असा विचार करत नसत, की हा मनुष्य वाचेल की न वाचेल. तो वाचेल वा न वाचेल, पण त्याला निदान इस्पितळात नेणं हे आपलं कर्तव्य आहे. तसंच इथे आहे. समोर पाण्याचा दुष्काळ उघड दिसत असेल, तर शक्य तितकं पाणी त्या प्रदेशाच्या शक्य तितकं जवळ नेणं हा एक मानवीय कार्यक्रम आहे. एकीकडे पाणी आहे, दुसरीकडे तहान आहे. तेव्हा ते पाणी तहानेकडे नेण्याचा आमचा कार्यक्रम आहे."
 श्रोत्यांमध्ये भाजपचे मोठे नेते व गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री केशुभाई पटेल तसेच गुजरातचे राज्यपालही होते. दुर्दैवाने त्या आंदोलनात गुजरात सरकारने जोशींना काहीही सहकार्य दिले नाही; उलट कडवा विरोधच केला. जोशींचा भाजपविरोध त्याला कारणीभूत असावा. किंवा कदाचित ह्या कारसेवेचे सगळे श्रेय गुजरात खेडूत समाज ह्या संघटनेला मिळू नये, भारतीय किसान संघ ह्या संघप्रणीत संस्थेचाही त्यात समावेश असावा, आपल्यालाही ह्याचे श्रेय मिळावे असाही काही विचार त्यांनी केला असणे शक्य आहे. धरणाचे काम बंद असतानाही तिथे जे कंत्राटदार होते, त्यांचे रोजचे जवळपास एक कोटीचे पेमेंट चालूच होते. ह्या फुकटच्या पैशाचा काही हिस्सा वरपर्यंत पोचत असणेही अशक्य नाही. नेमके काय कारण असेल ते सांगणे अवघड आहे, पण ह्या उपक्रमाला गुजरात सरकारने विरोध केला हे नक्की. याउलट लोकांचा मात्र त्याला पाठिंबा होता. किंबहुना, महाराष्ट्रातील एखादा शेतकरीनेता इथे येऊन धरणाच्या बाजूने बोलतो आहे याचेच जनतेला अप्रूप होते.

 त्या डिसेंबरमध्ये जवळजवळ पाच हजार शेतकरी ह्या जनआंदोलनात भाग घेण्यासाठी केवाडिया कॉलोनीकडे, जिथे मुख्य धरणप्रकल्प आहे त्या गावी, निघाले. पोलीस बंदोबस्त कडेकोट होता व बहुतेक आंदोलकांना वाटेतच अडवले गेले. एक लांबचलांब मानवी साखळी तयार करायची व धरणातले कळशीभर पाणी उपसून ते एकाच्या हातातून दुसऱ्याच्या हातात असे करत नर्मदेच्या मुख्य कालव्यात ते पाणी सोडायचे, अशी जोशींची आधी कल्पना होती. धरणातले पाणी कालव्यात सोडणे हे तसे सामान्य माणसाला अशक्यच असते, पण ही केवळ प्रतीकात्मक कृती होती. पर्यावरणवादी, लेखक, समाजकार्यकर्ते, राजकारणी, अर्थतज्ज्ञ, अर्थपुरवठादार, न्यायालये अशा सगळ्यांची मते तुम्ही धरणाबद्दलचे धोरण ठरवताना विचारात घेता, मग त्यांच्याप्रमाणे धरणाच्या पाण्यावर जे अन्न पिकवणार, त्या शेतकऱ्यांचाही या संदर्भात विचार करा असे समाजाला सांगण्यासाठी. सगळेच नर्मदा धरणाच्या विरोधात नाहीत, काही जण त्या धरणाच्या बाजूनेही आहेत हे माध्यमांना समजावे म्हणून. पण प्रचंड पोलीस बंदोबस्तामुळे तशी प्रतीकात्मक कृती करणेही अशक्य बनले होते.

राष्ट्रीय मंचावर जाताना३५९