पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गोष्टींचे बरेपण मान्य करायचे. अशी शिस्त त्यांनी आयुष्यभरासाठी बाणवून घेतली.
 रूढ अर्थाने त्यांचे परीक्षेतील गुणांच्या स्वरूपात प्रकट झालेले यश फारसे नेत्रदीपक नसेल; पण त्या चाकोरीच्या पलीकडे जाऊन विचार करताना त्यांची प्रखर बुद्धिमत्ता आणि बुद्धिप्रामाण्य सतत जाणवते. स्वतःच्या वागण्याचे, स्वतःच्या स्वभावाचे ते पुनःपुन्हा विश्लेषण करताना आढळतात. जे ऐकले किंवा बघितले तेही सारे त्यांनी जसेच्या तसे कधीच स्वीकारले नाही, तर प्रत्येक गोष्टीचा स्वतः विचार करून त्यातून काय बोध घ्यायचा तो ते घेत गेले.
 तीव्र आत्मभान हा जोशी ह्यांच्या व्यक्तिमत्त्वातील बालपणापासून ठळकपणे जाणवणारा दुसरा विशेष म्हणता येईल. तसे हे आत्मभान किंवा स्वत्वाची जाणीव प्रत्येकातच असते, पण जोशींमधे त्याची तीव्रता खूप अधिक असल्याचे जाणवते.
 ह्या तीव्र आत्मभानाचे अनेक तरल पदर ह्या कालखंडात आढळतात. इतरांच्या तुलनेतले आपले वेगळेपण (exclusivity) अधोरेखित करण्याची प्रवृत्ती किंवा मानसिक गरज, महत्त्वाकांक्षा, मनस्वीपणा, मानीपणा, अहंकार, आत्मविश्वास, आत्मकेंद्रितता, हेकटपणा, आत्मभानाला धक्का पोहोचल्यास उफाळून येणारी असुरक्षिततेची भावना इत्यादी – पण मूलतः हे त्या आत्मभानाचे विविध आविष्कार असावेत.
 पूर्वी लिहिल्याप्रमाणे काही शारीरिक कमतरतांमुळे न्यूनगंड निर्माण होऊ न देता त्यांच्यावर मात करायची जिद्दही ह्या आत्मभानातूनच आली असावी. शिकवणीला असलेला विरोधही तसाच.
 विलेपार्ल्याला शिकत असताना मोठ्या भावाशी, म्हणजे बाळशी, धाकट्या शरदचे एकदा कशावरून तरी जोरदार भांडण झाले. त्यावेळी माईंना मधे पडावे लागले. चूक शरदची आहे असे बहुधा त्यांना वाटले. शब्दाने शब्द वाढत गेला. रागाच्या भरात त्या शरदला खूप रागावल्या, थोडे मारलेही. आपण काहीच चूक केलेली नाही असे शरदचे म्हणणे; ते काही त्याने शेवटपर्यंत सोडले नाही. तरीही आई आपल्यालाच ओरडली व आपल्याला तिने मारलेही, यात आपला मोठा अपमान झाला असे वाटून शरद रागाने घरातून निघून गेला. कुठे जायचे काहीच नक्की नव्हते. खिशात फारसे पैसे नाहीत, वय अवघे १३-१४. रात्र झाली तरी तो घरी परतला नाही, तशी घरची सगळी मंडळी प्रचंड काळजीत पडली. त्याचे जोशी याच आडनावाचे एक मावसभाऊ पोलीस इन्स्पेक्टर होते, त्यांची यात खूप मदत झाली. त्यांच्याच संपर्कातल्या कोणीतरी तब्बल दहा दिवसांनी शरदला इगतपुरीला बघितले व मग तिथे जाऊन वडलांनी त्याला ताब्यात घेतले. पायीच चालत चालत, इकडे तिकडे भ्रमंती करत तो इतक्या लांबवर पोचला होता.
 त्यांच्या मोठ्या भगिनी सिंधूताई जोशींनी एके ठिकाणी लिहिले आहे, "तो प्रसंग आठवला,को हृदयात अजून कालवाकालव होते." हाही एक जोशीच्या आत्मभानाचा किवा मनस्वीपणाचा नमुना.

 या आत्मभानाचाच एक आविष्कार म्हणजे आपले वेगळेपण अधोरेखित करत राहणे.

शिक्षणयात्रा३७