पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मोकळ्या सार्वजनिक जागांवर आपले तंबू ठोकले, त्यावेळी चंडीगढमधील बव्हंशी हिंदू नागरिक आपल्या शहरावर झालेल्या ह्या शेतकऱ्यांच्या आक्रमणाने सुरुवातीला घाबरून गेले. पंजाबमधील सध्याची परिस्थिती पाहता हे स्वाभाविकच होते. पण हे शेतकरी अतिशय शिस्तबद्ध आहेत व आपले आंदोलन त्यांनी अतिशय दक्षतापूर्वक अहिंसक ठेवले आहे ही गोष्ट लौकरच स्पष्ट झाली. ह्याचे काही श्रेय शरद जोशी यांच्या संघटनकौशल्याला द्यायला हवे. लौकरच हे शेतकरी हिंदू आईबापांच्या मुलांशी खेळू लागले आणि दोन्ही समाजाच्या लोकांनी लौकरच एकमेकांची गळाभेट घ्यायला सुरुवात केली. एकमेकांशी गप्पा मारणे आणि त्यातून एकमेकांच्या अडचणी समजून घेणे हे दोन्ही समुदायांसाठी एक प्रबोधनच होते. होळीचा सण जल्लोषाने साजरा करताना खूपदा अवचित काहीतरी घडू शकते, पण इथल्या परस्परप्रेमाच्या त्या वातावरणात होळीमुळेही काही बाधा आली नाही. शेजाऱ्यांच्या घरात अगदी सहज, अनौपचारिकपणे जायची सवय असलेल्या ह्या शेतकऱ्यांनी लौकरच शहरी चंडीगढवासीयांची अंतःकरणे काबीज केली.)

 हा ग्रामीण शीख शेतकरी व शहरी पांढरपेशा हिंदू यांच्यातील फरक बद्रीनाथ देवकर यांच्या निरीक्षणातही आला होता. ते म्हणतात,
 “सुरुवातीला जेव्हा शेतकऱ्यांचे हे लोंढेच्या लोंढे चंडीगढमध्ये येऊ लागले, तेव्हा स्थानिक नागरिक काहीसे घाबरूनच गेले. हे शेतकरी मुख्यतः शीख होते, बऱ्यापैकी राकट होते व चंडीगढसारख्या पॉश शहरातील सोफिस्टिकेटेड लोकांपेक्षा ते अगदी वेगळे आहेत हे लगेचच कळत होतं. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी सर्व शहरवासीयांनी आपापल्या बायकामुलांना आत घेऊन घरांची दारं-खिडक्या घट्ट लावूनच घेतली. काहीशा भेदरलेल्या नजरेनेच ते ह्या शेतकऱ्यांकडे बघत होते. अगदी पाणी मागण्यासाठी कोणी शेतकऱ्याने दार ठोठावलं तरी दार उघडत नव्हते. न जाणो, हे कोणी अतिरेकी असले तर, अशी भीती त्यांना वाटत होती. पंजाबातील त्यावेळची परिस्थितीच तशी होती. पण हळूहळू त्यांची भीड चेपली. दुपारी ह्या शेतकऱ्यांनी बरोबर बांधून आणलेल्या भाकऱ्या खाल्ल्या व नंतर ती सगळी जागा पुन्हा व्यवस्थित साफ केली हे शहरी माणसांनी बघितलं. त्यानंतर मात्र त्यांनी ह्या शेतकऱ्यांना पाणी द्यायला सुरुवात केली. रात्री शेतकऱ्यांनी आपापल्या घोळक्यात करमणुकीचे कार्यक्रम करायला सुरुवात केली. तेव्हातर बंगल्यातली मंडळी बिनधास्त बाहेर येऊन त्या कार्यक्रमात. नाच-गाण्यात भाग घेऊ लागली. हे कोणी अतिरेकी वगैरे नसून ही आपल्यासारखीच सरळमार्गी माणसं आहेत, हा विश्वास त्यांना वाटू लागला. पुढल्या पाच-सहा दिवसांत तर ह्या शेतकऱ्यांची व शहरी मंडळींची चांगलीच दोस्ती झाली."

 ऐतिहासिक अशा या चंडीगढ वेढ्यानंतर जे घडत गेले ते मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडणारेच होते. पंजाब शासनाने स्थापन केलेल्या जोल समितीने आपला अहवाल

अटकेपार२७१