पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वीकारावे व बाकी बाबतीत लवचीक धोरण ठेवावे," असे ते म्हणाले.
 त्यांच्या ह्या विस्तृत भाषणानंतर चमत्कार घडावा, तसे बैठकीतील वातावरण बदलले. 'स्वतः जोशींच्या तोंडून हे सारं ऐकणं हा एक अविस्मरणीय असा अनुभव होता, असे मत नंतर बोलणाऱ्या जवळजवळ प्रत्येकाने व्यक्त केले. 'साधी जीन्स आणि बुशशर्ट घालणारा, शेतकरी अजिबात न दिसणारा हा माणूस जे म्हणाला, ते आम्हाला पूर्वी कधीच कोणी सांगितलं नव्हतं', 'तुम्ही महाराष्ट्रातले शेतकरी भाग्यवान आहात, म्हणून तुम्हाला असा नेता मिळाला', 'अनेक शेतकरी नेते आजवर बघितले, पण इतका अभ्यासू नेता नव्हता बघितला' अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या.
 पुढील सर्वच सत्रांवर आता जोशींची निर्विवाद पकड बसली. युनियनचे आता जणू ते अलिखित अध्यक्षच बनले. बैठकीच्या तिसऱ्या दिवशी, म्हणजे रविवार ३० मे रोजी, संमत झालेल्या ठरावांवरही जोशींच्या अर्थमूलक विचारसरणीची छाप उघड होती. 'शेतकऱ्याला रास्त भाव न देण्याच्या शासनाच्या धोरणाचा ही युनियन निषेध करते' हा पहिलाच ठराव होता. आणखीही एक महत्त्वाचा ठराव होता, 'शेतीमालाचा साठा, प्रक्रिया, व्यापार व निर्यात यांसंबंधीचे सर्व निबंध शासनाने दूर करावेत. यांसंबंधी परदेशात झालेल्या तांत्रिक सुधारणांच्या स्वीकाराबद्दल शेतकऱ्यावर कुठलीही बंधने असू नयेत. त्यासाठी आवश्यक अशी यंत्रसामग्री परदेशातून आयात करण्याची शेतकऱ्याला मुक्त परवानगी असावी.'
 बैठकीच्या औपचारिक सांगतेनंतर किसान युनियनने खन्ना गावातून एक मोठी शोभायात्रा काढली. आर्य हायस्कूलच्या मैदानावर भरलेल्या एका मोठ्या सभेत शोभायात्रेचे स्वागत केले गेले. साधारण तीसेक हजार शेतकरी हजर होते. जोशी व्यासपीठावर पोचताच त्यावेळी चालू असलेले भाषण थांबवून जोशींचे आगमन माइकवरून जाहीर केले गेले व 'किसान युनियन झिंदाबाद'च्या घोषणांनी सगळा परिसर दुमदुमून गेला. जाहीर सभेतील आपले पहिले हिंदी भाषण जोशींनी याच खन्नातील सभेत केले. सुरुवातीलाच जोशींनी शहीद भगतसिंगांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले, “माझी शेती जिथे आहे तिथून जवळच राजगुरूनगर आहे. ह्याच राजगुरूने क्रांतिकार्यात भगतसिंगाला मृत्यूच्या घटकेपर्यंत साथ दिली होती. तेव्हा पंजाब आम्हाला किंवा आम्ही पंजाबला नवखे नाही. आमचा रिश्ता पुराना आहे व त्याला उजाळा देण्यासाठीच आम्ही इथे आलो आहोत. पंजाब म्हणजे आमचा वडील बंधू आहे." आपल्या पस्तीस मिनिटांच्या भाषणाच्या या भावस्पर्शी सुरुवातीपासूनच जोशींनी सभेतील प्रत्येकाला भारावून टाकले.

 यानंतरच्या मानसा, नवा शहर, फिरोजपूर व गोविंदबालसाहिबा येथील चार सभाही अशाच गाजल्या. स्थानिक पंजाबी वृत्तपत्रांतील बातम्यांमध्येही जोशींनाच सर्वाधिक प्राधान्य दिले गेले. मानसा आणि नवा शहर ह्यांच्या दरम्यान लुधियाना शहराजवळ सुप्रसिद्ध पंजाब कृषी विद्यापीठ आहे. संपूर्ण आशिया खंडात ते नामांकित आहे; विशेषतः तेथील ग्रंथालय.

अटकेपार२५९