पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्थापन केली. अहिर, जाट, गुजर आणि रजपूत ह्या शेती करणाऱ्या तत्कालीन अखंड पंजाबातील चार जमाती त्यांच्या डोळ्यांपुढे होत्या व त्यांची आद्याक्षरे एकत्र करून 'अजगर' नाव बनले होते. त्या मूळ संघटनेचा अधिक विस्तार करत पुढे त्यांनी 'जमीनदारा खेतीबाडी युनियन' स्थापन केली. ही घटना साधारण १९२५ सालची. शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा थोडा सुसह्य व्हावा म्हणून छोटूरामनी त्यावेळी पंजाब विधिमंडळात एक बिल आणले होते. ते असे होते, 'शेती उत्तम पिकत असूनही शेतकरी कर्जात बुडतो आहे. त्यामुळे सावकार जप्ती आणून त्यांच्या जमिनी काढून घेत आहेत. अशा प्रकारे सावकारांनी जमिनीवर जप्ती आणू नये म्हणून त्याविरुद्ध सरकारने कायदा करावा.' तत्कालीन काँग्रेस सरकारने ह्या बिलाला कडाडून विरोध केला होता. काँग्रेसचे म्हणणे असे होते, की 'सावकारांनी जमिनी जप्त केल्या नाहीत, तर त्यांना धंदा बंद करावा लागेल व तसे झाले तर अडचणीच्या वेळी शेतकऱ्यांना कर्ज कसे मिळणार?' गव्हाला अधिक भाव मिळावा म्हणूनही छोटूराम सतत प्रयत्न करत असत. 'इतकाइतका भाव दिल्याशिवाय आम्ही गहू विकणार नाही असे त्यांनी एकदा ब्रिटिश गव्हर्नरलादेखील सुनावले होते. हिंदू, मुसलमान व शीख ह्या तिन्ही धर्मांचे शेतकरी छोटूरामना अगदी देवासमान मानत. सर छोटूराम १९४६ साली वारले; पण त्यांची युनियन इतकी ताकदवान होती, की १९४६ सालापर्यंत मुस्लिम लीगचे प्रमुख महमद अली जिनांना त्या प्रांतात पाऊलसद्धा ठेवता आले नाही. धार्मिक भेदांच्या पलीकडे जाऊन निखळ आर्थिक प्रश्नावर शेतकऱ्यांना एका राजकारणविरहित झेंड्याखाली एकत्र आणणारा नेता म्हणून सर छोटूराम ह्यांच्याविषयी जोशींना खूप आदर होता.

 शरद जोशी यांचे पंजाबमधील सर्वांत जवळचे सहकारी सरदार भूपिंदर सिंग मान यांच्याविषयी इथे लिहायला हवे. भारती किसान युनियन (बीकेयु) या पंजाबातील सर्वांत मोठ्या शेतकरी संघटनेचे १९८० सालापासून ते सदस्यांनी निवडून दिलेले अध्यक्ष आहेत. यातील 'भारती' शब्द पंजाबी नावात आहे; अन्यत्र बऱ्याचदा त्याऐवजी 'भारतीय' हा शब्द वापरला आहे. मान यांची व प्रस्तुत लेखकाची पहिली भेट ३० जुलै २०१२ रोजी बुंदेलखंडातील बांदा ह्या गावी किसान को-ऑर्डिनेशन कमिटी (केसीसी)च्या एका बैठकीच्या वेळी झाली होती. जोशींच्या आमंत्रणावरून तिथे त्यांच्याबरोबर गेलो होतो. त्यावेळी मान यांच्याबरोबर थोड्याफार गप्पा झाल्या होत्या, पण त्या पुरेशा नव्हत्या. तो योग आमच्या पुढील भेटीत आला. ८ मार्च २०१६ रोजी चंडीगढ येथील त्यांच्या घरात. शरद जोशींच्या चळवळीतील पंजाबपर्व समजून घेण्यासाठी तिथे गेलो असताना. पुढे त्यांच्याबरोबर केलेल्या मुक्कामात व बटाला, अमृतसर, वाघा इथे त्यांच्यासमवेत केलेल्या प्रवासात.
मान यांचा जन्म १५ सप्टेंबर १९३९चा. उंच शिडशिडीत शरीरयष्टी व झपाझप चालणे यामुळे त्यांच्या वयाचा पटकन अंदाज येत नाही. ते सांगत होते,

 "माझं जन्मगाव आता पाकिस्तानात आहे. घरची खूप मोठी शेतीवाडी होती, संपन्न घरदार होतं. वडील अकालीच वारले. मी एकुलता एक मुलगा. दोन बहिणी. फाळणीनंतर

अटकेपार२५३