पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२६०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री ह्यांच्या डोळ्यांपुढे कदाचित पंजाबच असू शकेल. इथली माणसे कष्टाळू, स्वतःच्या पायावर उभी राहणारी. गुरुबाणी ऐकण्याइतकीच भांगडा करण्यातही रमणारी. 'माझ्या रक्ताने ही सगळी भूमी न्हाऊन निघू दे' असा आशय व्यक्त करणारे 'मेरा रंग दे बसंती चोला' हे भगतसिंगांचे गीत इथले सर्वाधिक लोकप्रिय गीत.
 आपल्या महाराष्ट्राशी शिखांचे नाते विशेष सौहार्दाचे आहे. त्यांचे दहावे व शेवटचे गुरू गोबिंदसिंग ह्यांच्या समाधीमुळे नांदेडला शीख तीर्थक्षेत्रच मानतात. अमृतसरहून येणारी सचखंड एक्स्प्रेस नांदेडला पोचते किंवा तिथून सुटते, तेव्हा गाडीतील व प्लॅटफॉर्मवरील सगळ्यांनाच रुचकर असा तुपाळ मुगाच्या हलव्याचा प्रसाद आवर्जून दिला जातो; कधीकधी संपूर्ण जेवणही दिले जाते.
 इथली शेतीही खूप महत्त्वाची. दुथडी भरून वाहणाऱ्या झेलम, सतलज, रावी, चिनाब आणि बियास ह्या पाच नद्यांवरून ह्या प्रांताला पंजाब हे नाव पडले. त्यांच्या वर्षानुवर्षे वाहून आलेल्या गाळामुळे सुपीक बनलेली इथली भूमी. हवामान अनुकूल, पाणीही भरपूर. डोंगराळ भाग जवळपास नाहीच, सगळी भूमी सपाट व शेतीयोग्य. ट्रॅक्टरसारख्या अनेक आधुनिक अवजारांचा शेतीत सर्रास वापर. त्यामुळे सुजल सुफल बनलेला हा प्रदेश. भारताचे धान्याचे कोठार' हा लौकिक सार्थ ठरवणारी इथली शेती.
 दुर्दैवाने फाळणी झाली त्यावेळी बहुतेक कालवे पश्चिम पंजाबात होते व ते पाकिस्तानात समाविष्ट झाले. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात इथे बरीचशी शेती पाण्याअभावी उजाड झाली होती. पण पुढे भाक्रा-नांगल धरणाने इथली शेती पुन्हा एकदा बहरली. जमिनीत झिरपणाऱ्या मुबलक पाण्यामुळे कूपनलिका कोपऱ्याकोपऱ्यात खणल्या गेल्या. सत्तर टक्के शेतजमीन पाण्याखाली आली. इथल्या शेतकऱ्याने नवे तंत्रज्ञान अहमहमिकेने स्वीकारले. गव्हाप्रमाणे इथला बासमती तांदूळही जगभर जाऊन पोचला. सर्वच शेतकरी वर्षातून दोन पिके घेत - एक गव्हाचे, दुसरे भाताचे. साठ व सत्तरच्या दशकात झालेल्या हरितक्रांतीची फळे देशात सर्वाधिक इथेच पाहायला मिळत. आजदेखील संपूर्ण देशातून केंद्र सरकारच्या कोठारात जेवढा गहू जमा होतो, त्यापैकी सत्तर टक्के गहू हा एकट्या पंजाबातून जमा होतो. शेतीतील समृद्धीतूनच जालंदर, लुधियाना यांसारख्या शहरांत असंख्य छोटे-मोठे उद्योगधंदे उभे राहिले. बघता बघता पंजाब पुन्हा एकदा समृद्ध बनला. ज्याला शेतीच्या संदर्भात भारतात काही काम करायचे आहे, तो पंजाबकडे दुर्लक्ष करूच शकणार नाही.
 पण पंजाब अखंड होता त्या काळापासूनच इथल्या शेतकऱ्यांना नेहमीच कर्ज काढावे लागे; पिके चांगली आली तरीही. अशी विचित्र परिस्थिती नेमकी कशामुळे येते त्याची शास्त्रशुद्ध कारणमीमांसा त्यावेळी फारशी कोणाला करता आली नाही तरी तिची झळ मात्र सर्वच शेतकऱ्यांना पोचत असे.

 शेतकऱ्यांची स्थिती सुधारली पाहिजे, ह्याची मागील शतकात पहिली जाणीव अखंड पंजाब प्रांतातील सर छोटूराम ह्या जाट नेत्यांना झाली. ते स्वतः मोठे शेतकरी होते. शासनदरबारी त्यांना फार मान होता. 'अजगर' ह्या काहीशा विचित्र नावाची एक संघटना त्यांनी

२५२अंगारवाटा... शोध शरद जोशींचा