पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२५९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



१०



अटकेपार


 २५ नोव्हेंबर २०१४. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व भारताचे पाचवे उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांची तिसावी पुण्यतिथी. संध्याकाळी सहाची वेळ.
 मुंबईतल्या नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाचे सभागृह श्रोत्यांनी तुडुंब भरले होते. त्या समारंभात शरद जोशी यांना शरद पवार यांच्या हस्ते मानाचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार दिला गेला. श्री. पवार मे २००४ ते मे २०१४ अशी सलग दहा वर्षे केंद्रात कृषिमंत्री होते. त्या पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरची एक आठवण सांगताना ते म्हणाले,

कृषिमंत्री म्हणून पंजाबमध्ये गेल्यानंतर ठिकठिकाणी माझं स्वागत व्हायचं. आणि मला आठवतंय, की अनेक ठिकाणी शेतकरी मेळाव्यात गेल्यानंतर स्वागत करणारा वक्ता 'आज के मेहमान शरद जोशी' असं म्हणूनच माझं स्वागत करायचा! नंतर स्वतःची चूक त्याच्या लक्षात आल्यानंतर, 'नही, नही, शरद पवार' असं तो म्हणायचा! याचा अर्थ पंजाबमधल्या त्या कष्टकरी शेतकऱ्यांमध्ये ज्यांनी महत्त्वाची कामगिरी केली, त्या शरद जोशींचं नाव तिथल्या घराघरामध्ये पोचलं होतं. हे मी पंजाबात अनेकदा पाहिलंय.

(राष्ट्रवादी, डिसेंबर २०१४, पृष्ठ ५३)

 त्या कार्यक्रमात प्रस्तुत लेखक मंचावर हजर होता व पवार यांचे हे उद्गार ऐकल्यावर सर्व श्रोत्यांप्रमाणे जोशी यांच्याही चेहऱ्यावर विलसणारे हास्य आणि आनंद यांचे मिश्रण बघताना 'आज इतक्या वर्षांनी का होईना, पण जोशींच्या पंजाबमधील महत्त्वाच्या कार्याची महाराष्ट्रात दखल घेतली जात आहे हे जाणवून डोळे पाणावत होते. अर्थात जोशींचा हा जवळजवळ शेवटचाच मोठा असा जाहीर कार्यक्रम असेल याची त्यावेळी कोणालाच कल्पनाही नव्हती.

 अखंड पंजाबचे भारतातील ऐतिहासिक स्थान एकमेवाद्वितीय असेच आहे. सीमेवरचा प्रांत असल्याने परकीयांची आक्रमणे पंजाबने सततच झेलली आहेत. 'मार्शल रेस' म्हणता येईल तसे इथले लोक. शरीराने भरभक्कम आणि वृत्तीनेही आक्रमक. बहुतेक शीख कुटुंबांत एक मुलगा शेतीत तर दुसरा लष्करात ही परंपरा. 'जय जवान, जय किसान' घोषणा देताना

अटकेपार२५१