पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२५७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मार्गक्रमणात आहे, असे मानल्यानंतर आदर्शभूत समाज ही कल्पनाच अर्थहीनहोते. प्रत्येक छायाचित्राचा एक केंद्रबिंदू असतो. त्या बिंदूत प्रतिमा स्वच्छ आणि स्पष्ट असते. त्या बिंदूपासून जितके दूर जावे, तितकी प्रतिमेची गुणवत्ता कमी होत जाते. प्रत्येक छोट्या-मोठ्या विचारवंताच्या विचारपद्धतीचेही असेच असते. काही केंद्रबिंदूत त्यांना त्यांच्या काळाला व परिस्थितीला अनुरूप असा साक्षात्कार होतो. बुद्धिनिष्ठ सचोटी राखन आपला विचार तेवढ्यापुरताच मर्यादित ठेवावा हे आजपर्यंत थोराथोरांना जमलेले नाही. आपल्याला गवसलेल्या सत्यकणांच्या आधारे विश्वव्यापी पसाऱ्याला गवसणी घालण्याच्या मोहाला मोठे-मोठे बळी पडले आहेत. विश्वाला गवसणी घालण्याच्या प्रयत्नात त्यांनी स्वतःच्या पराभवाचा पाया घातला.

शेतकरी संघटनेची विचारपद्धती ही बुद्धिवादी, तर्ककठोर आहे. औद्योगिक व्यवस्थेच्या आर्थिक, सामाजिक समस्यांमुळे विकासाच्या, स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावण्याचा मार्ग कुंठित झाला किंवा कसे, आता पुन्हा एकदा तोंड फिरवून उलटी वाटचाल करणे अपरिहार्य आहे किंवा कसे, या चिंतेने त्रासलेल्या मनुष्यजातीला निदान आर्थिक अडथळ्यातून सोडवण्याचा मार्ग संघटनेने दाखवला आहे. ऊर्जा, नैसर्गिक साधनसंपत्ती यांच्या तटवड्याचे प्रश्न मनुष्य आपल्या दुर्दम्य बुद्धिसामर्थ्यावर यथावकाश सोडवेल. अगदी सूर्य कोसळायला आला तर त्याच्या जागी मनुष्यनिर्मित सूर्य ठेवण्याचीही त्याची झेप आहे.

(प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश – भाग दुसरा, पृष्ठ ४१-८)

ह्याच विचारसरणीत जोशींचा सामाजिक कार्याला असलेला विरोधही बीजरूपात दिसतो. त्यामुळेच सामाजिक कार्यावर त्यांनी प्रखर टीका केली आहे. ते लिहितात-

आजवरच्या सामाजिक इतिहासाचा आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल, की ज्या प्रकारचा विकास या कार्यातुन घडायला हवा, त्या प्रकारचा विकास या कार्यातून कधीही साधला जाणे शक्य नाही. विकासामागच्या प्रेरणा या अगदी वेगळ्या असतात. या देशातील जे स्वयंस्फर्त कार्य गेल्या वीस-पंचवीस वर्षांत मी बघितले, त्यावरून माझे अशा कार्याविषयीचे मत प्रतिकूल बनले आहे. कार्यकर्त्यांचा छुपा पण प्रखर अहंकार, त्यांची ढोंगबाजी, त्यांची नाटके, सेवेच्या बुरख्याखाली स्वतःची सोय पाहत राहणे, त्यांच्यातील हेवेदावे, त्यांच्यातील व्यासंगाचा अभाव, मूळ प्रश्न टाळून उगाचच काहीतरी छोटेसे पॅचवर्क स्वरूपाचे काम करीत राहण्याची आत्ममग्न प्रवृत्ती. हे सगळे विचारात घेता अशा स्वरूपाच्या कामाची समाजाला काहीही आवश्यकता नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. मी एक पराकोटीचा व्यक्तिवादी, individualistic माणूस आहे. व्यक्ती हेच विचाराचे

शेतकरी संघटना : तत्त्वज्ञान आणि उभारणी२४९