पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२५६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असलेले योग, कुंडलिनी, साक्षात्कार, गीता, अनेक नामवंत तत्त्वज्ञ आणि संत यांनाही त्याचा झटका बसल्याशिवाय राहणार नाही.

 देशापुढील समस्या मूलतः नैतिक आहेत, असेही जोशींना अजिबात वाटत नाही. किंबहुना, तशा भूमिकेचा त्यांनी प्रथमपासून उपहासच केला आहे. सामाजिक क्षेत्रातील अन्य व्यक्तींपेक्षा जोशींचे ते एक वेगळेपण आहे. शेतकरी संघटनेच्या तत्त्वज्ञानामध्ये 'शेतकरी संघटनेचे नैतिक दर्शन' यावर सुरुवातीपासूनच जोशींनी भर दिला आहे. अन्य कुठल्या संघटनेने नैतिकतेच्या मुद्द्यावर इतका भर दिल्याचे व मुख्य म्हणजे त्याचवेळी नैतिकतेचे महत्त्व कमी लेखल्याचे सहसा आढळणार नाही. ह्यात एक मोठाच अंतर्विरोध आहे हेही जाणवते. जोशींची भूमिका साधारण पुढीलप्रमाणे आहे :

स्वार्थाचा त्याग करून दुसऱ्याचे भले करण्यात काही एक मोठेपण आहे असे बहुतेक काळात मानले गेले आहे. स्वार्थ ही सहजप्रवृत्ती आहे, तर स्वार्थ सोडून देण्याकडे सर्व महापुरुषांची शिकवण. जे दुर्लभ त्याची किंमत जास्त, या मागणी- पुरवठ्याच्या अर्थशास्त्रीय सिद्धांतानुसार परहितरत वर्तणुकीला अलोट महत्त्व मिळाले असावे.

एकेकाळी मुंबईतील माणसे बसच्या रांगेची शिस्त कटाक्षाने पाळत. एका बसमध्ये जागा मिळाली नाही तर शांतपणे दुसरी बस येण्याची वाट पाहत थांबत. त्या काळी दिल्लीकर बस पकडताना पराकोटीची बेशिस्त आणि हुल्लड दाखवत असे. याचा अर्थ दिल्लीवाले कमी नीतिमान आहेत असा नाही. मुंबईच्या व्यवस्थेत एक बस गेली तरी दुसरी, ती नाही तरी त्या पुढची बस मिळण्याची जवळजवळ खात्री वाटत असे. दिल्लीत तर तशी आशाही नसे. यामुळे दोघांच्या वर्तणुकीत फरक पडतो.

प्रचंड दुःख आणि यातना सोसून केवळ दुसऱ्याच्या भल्याकरिता मी हे दिव्य करीत आहे असे कोणी म्हटले, की माझ्या मनात भीतीच्या घंटा वाजू लागतात. असे वाटते, की या बोकेसंन्याशाच्या मनात काही क्षुद्र स्वार्थ आहे, ते तो धूर्तपणे लपवत आहे. मी हे माझ्या आनंदाकरिता करतो आहे, स्वार्थाकरिता करतो आहे, हे सांगण्यात कोणाला शरम का वाटावी? परार्थाची साखर पेरणारा क्षुद्र स्वार्थ साधतो. त्यापेक्षा स्वार्थी बना. जितक्या व्यापक अर्थांनी, जितक्या मार्गांनी आयुष्य परिपूर्ण करता येईल तितके करा. दुसऱ्याचे हक्क लाथाडू नका, परार्थ म्हणून नव्हे, निव्वळ स्वतःच्या आयुष्याची परिपूर्णता कमी होऊ नये म्हणून, अशी शिकवण ठीक. हीच खरीखुरी नैतिकता होईल.

शेतकरी संघटना भविष्यातील आदर्श समाजाचे काहीच स्वप्न देत नाही; स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावणे हा मार्ग सांगते, पण या कक्षा रुंदावत पोचायचे कुठे हेही सांगत नाही. नैतिकता ही कोणत्याही एका विवक्षित व्यवस्थेत नाही, ती

२४८अंगारवाटा... शोध शरद जोशींचा