पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२५५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 मुख्य म्हणजे शेतीतील समृद्धीतून शेतकऱ्याच्या श्रमाला मोल प्राप्त होईल. जोशी म्हणतात,
 "आज शेतकऱ्याचा सहा वर्षांचा मुलगा सकाळी उठून शेण गोळा करायला जातो, पण त्याच्या श्रमाचे काही मूल्य धरले जात नाही. शेतकऱ्याच्या घरातील पोक आलेली सत्तरऐंशी वर्षांची म्हातारी खुरपे घेऊन शेतात काम करते. कारण तिच्या मनामध्ये धाक आहे, की आपला पोरगा इतका काही परिस्थितीने गांजून गेलाय, की कदाचित चिडून एक दिवस म्हणायचा, 'म्हातारे, तू मरतसुद्धा नाहीस – फुकट खात्येस!' पण तिच्या शेतातल्या त्या कष्टाला आज काहीच मोबदला नाही."
 ही सारी परिस्थिती शेतीमालाला उचित भाव मिळू लागला की पालटेल. शेतकऱ्याच्या श्रमाला किंमत व प्रतिष्ठा प्राप्त होईल. येणारी समृद्धी म्हणजे एक प्रचंड आर्थिक व सामाजिक क्रांतीच असेल.
 शेतकरी संघटनेचे तत्त्वज्ञान म्हणजे इतर बहुसंख्य संघटनांप्रमाणे इकडून तिकडून गोळा केलेल्या विविध मुद्द्यांची गोळाबेरीज नव्हती, अनेक चिंध्या एकत्र करून बांधलेले ते गाठोडे नव्हते. हा विचार म्हणजे एका धाम्याने विणलेले एकजिनसी महावस्त्र आहे, असे जोशी म्हणत. तो एक धागा होता 'शेतीमालाला रास्त भाव' हा एक-कलमी कार्यक्रम. अंतिमतः हा कार्यक्रम सर्वच जीवनक्षेत्रांना व्यापणारा आहे ह्याची पूर्ण खात्री असल्यामुळेच जोशी त्या काळात अन्य कुठल्याच उपक्रमात इच्छा असूनही सहभागी झाले नाहीत. अंधश्रद्धर्निर्मूलन व विज्ञानप्रसार यांसाठी एक यात्रा महाराष्ट्रात काढली गेली होती व त्यात जोशींनी सामील व्हावे अशी विनंती त्यांना भोसरी तेथील विज्ञान यात्रा समितीने केली होती. त्यांना नकार कळवणाऱ्या आपल्या १ ऑक्टोबर १९८२च्या पत्रात ती भूमिका नेमकी प्रकट झाली आहे. त्यात जोशी लिहितात-

शेतकऱ्यांविषयी बोलायचे झाले, तर त्यांच्या सर्व श्रद्धा शेतीच्या परिस्थितीवर अवलंबून आहेत. पावसाच्या अनिश्चिततेमुळे विज्ञाननिष्ठा अंगी बाणूच शकत नाही. शेतातील पीक आणि परिणामी कच्च्याबच्च्यांचे जीवन पावसाच्या पडण्या न पडण्यावर अवलंबून आहे, या जाणिवेने शेतीचा जुगार सतत खेळणारा शेतकरी विज्ञाननिष्ठा बुद्धीला पटली, तरी मनाला पटू देणार नाही. आधुनिक औषधोपचार जवळपास उपलब्ध नाही, असला तरी परवडत नाही. म्हणून जवळ असेल त्या वैदूभोंदूंचे औषधपाणी करावे लागते. आपल्या प्रियजनांना उत्तमातील उत्तम औषधपाणी करणे आपल्याला जमले नाही, ही मनाला घरे पाडणारी जाणीव विसरण्यासाठी वैदूभोंदूंच्या प्रभावाच्या कथा रचाव्या लागतात आणि स्वतःही त्यावर विश्वास ठेवाव लागतो. निसर्गाच्या लहरीपणामुळे होणाऱ्या पीकबुडीपासून शेतकऱ्याला संरक्षण मिळेल, म्हणजे वास्तविक उत्पादनखर्च भरून निघण्याची शाश्वती मिळेल, त्या दिवशी या प्रचंड ताकदीला विज्ञाननिष्ठा शिकण्याची गरजच राहणार नाही. लोकभ्रम, अंधश्रद्धा, वैदू-भोंदू तर दूर होतीलच; पण आजच्या सुशिक्षितांच्या शहरी मनाला प्रिय

शेतकरी संघटना : तत्त्वज्ञान आणि उभारणी२४७