पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



स्वतःच्याच देशातील दुर्बल घटकांचे शोषण चालू ठेवतील याचा अंदाज त्याला आला नाही. ज्या पाश्चात्त्य समाजात औद्योगिक क्रांती खूप पूर्वीच सुरू झाली होती, तिथे हा कामगारवर्ग मोठा होता व तो शहरांत राहणारा होता. उलट शेतकरीवर्ग हा ग्रामीण भागात राहणारा होता. त्यातून 'शहर विरुद्ध गाव' (Town versus County') हा वाद काही काळ तिथे निर्माण झाला, पण सुदैवाने पुढे तेथील उद्योगक्षेत्राचे स्वरूप खुपच सुधारत गेले व त्यामुळे त्या वादातून तिथे रक्तरंजित राज्यक्रांती कधी झाली नाही.
 साम्यवादी राज्यक्रांती झाली ती मुख्यतः रशियात - जिथे उद्योगक्षेत्र अजून विकसितच झाले नव्हते व साहजिकच हा कामगारवर्ग अत्यल्प होता; सगळा समाज मुख्यतः शेतीप्रधानच होता. खरे तर रशियात जो सत्ताबदल १९१७ साली झाला, तो साम्यवादावर वा मार्क्सवादावर आधारित होता, हे जोशींना अजिबात मान्य नव्हते. पहिल्या महायुद्धात पराभूत होऊन रशियात परतणारे सैनिक, बंड करून उठलेल्या रशियन स्त्रिया व एकूण देशातील असंतोष यांमुळे झारशाही कोलमडून पडली व त्याचा फायदा घेऊन साम्यवादी सत्तेवर आले, असे ते मानत. त्यांच्या मते ह्या साऱ्या सत्तापालटाला काहीतरी तात्त्विक बैठक द्यायची म्हणून केवळ साम्यवादी तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान पुरवले गेले; प्रत्यक्षात रशियात जे घडले त्याचा साम्यवादाशी तेवढाच संबंध होता, जेवढा एखाद्या गावातील सुभाष केशकर्तनालयाचा नेताजी सुभाषचंद्र बोसांशी संबंध असतो!
 रशियात औद्योगिकीकरण हे सरकारी धोरणातून घडवून आणले गेले; शेतीप्रधान देशाचे एक-दोन पिढ्यांमध्ये औद्योगिक देशात परिवर्तन करण्यासाठी, शेतीतील भांडवल उद्योगक्षेत्रासाठी वळवण्यासाठी शेतीमालाला कमीत कमी भाव देणे क्रमप्राप्त ठरले. तो अधिकृत शासकीय धोरणाचाच भाग बनला. स्टालिनच्या राजवटीत तर शेतकऱ्यांना चिरडूनच टाकले गेले. 'आज हे शेतकरी गव्हाला वाढीव भाव मागताहेत, तो त्यांना दिला, तर उद्या ते सोन्याची घड्याळे मागू लागतील, हे त्याचे उद्गार प्रसिद्ध आहेत. त्याने शेतीवरची स्वतंत्र मालकी काढून टाकली व त्या जागी सामुदायिक शेती देशभर राबवली. त्यात व्यक्तिगत लाभ काहीच होणार नसल्याने अधिक मेहनत करायला व अधिक धान्य पिकवायला तिथे शेतकऱ्याला काही उत्तेजनच राहिले नाही. जोशी म्हणतात,
  "ह्या अत्यंत चुकीच्या धोरणामुळे एकेकाळी अन्नधान्य निर्यात करत असलेल्या रशियावर परदेशाहून अन्नधान्य आयात करायची वेळ आली आणि इतक्या वर्षांनंतर आजसुद्धा रशिया अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ शकलेला नाही. किंबहुना अन्नधान्याचा आत्यंतिक तुटवडा व त्यामुळे जनसामान्यांत खदखदत असलेला असंतोष हे पुढे नव्वदच्या दशकात रशियातील साम्यवादी राजवट कोसळून पडली ह्याचे एक मोठे कारण होते."
  परंतु हेही खरे आहे, की रशियाने एक-दोन पिढ्यांमध्ये मोठे औद्योगिकीकरण घडवून आणले व त्यामुळे दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र झालेल्या जवळजवळ सर्वच देशांनी आपल्या विकासासाठी, म्हणजे मुख्यतः शेतीप्रधान अर्थव्यवस्थेचे रूपांतर उद्योगप्रधान अर्थव्यवस्थेत करण्यासाठी, रशियन प्रतिमान स्वीकारले. स्वतंत्र भारतातील सरकारनेही समाजवादी


२२८ ◼ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा