पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



पुढाऱ्यांच्या पक्षोपपक्षातील कोलांट्या उड्या यामुळे सामान्य जनतेच्या मनात सर्व राजकीय पक्षांविषयी निराशा निर्माण झाली, घृणा निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर आज आपण 'स्वातंत्र्यानंतरची गेली ३३ वर्षं शासन शेतकऱ्यांना फसवत आलं आहे' हा आपला विचार ताठ मानेने, जोरजोराने शेतकऱ्यांपुढे मांडतो. ते ऐकतात आणि टाळ्या वाजवतात. पण ७५ साली अशी निराशा नव्हती. तेव्हा जर आपण असं बोललो असतो, तर कदाचित लोकांनी ऐकून घेतलं नसतं."
 शेकडो पुस्तके वाचून जे कधीच समजले नसते ते जोशींना अनुभव शिकवत गेला. शेती करता करता आणि येत असलेल्या अनुभवांची त्याचवेळी आपल्या मनात छाननी करता करता हळूहळू जोशींची खात्री पटली, की सरकारने विकासासाठी जे रशियन धाटणीचे समाजवादी प्रतिमान समोर ठेवले आहे त्या प्रतिमानात जाणूनबुजून शेतीमालाची किंमत अतिशय कमी ठेवली आहे; बियाणे-खते-औषधे-वीज-पाणी-वाहतूक-मजुरी असे अगणित आणि सतत वाढणारे खर्च भागवता भागवता शेतकरी कायम तोट्यातच राहतो: शेतीमालाच्या अपुऱ्या किमती हेच आपले खरे दुखणे आहे; शेतकऱ्याला त्याच्या श्रमांचे उचित दाम मिळाले तर त्याला अन्य कुठल्याही धर्मादायाची वा अनुदानाची भविष्यात गरज राहणार नाही; त्याचे आजचे लाचारीचे जिणे संपेल. त्यातूनच 'शेतीमालाला रास्त भाव' हा एक-कलमी कार्यक्रम त्यांच्या मनात तयार झाला.
 ह्या कार्यक्रमाच्या समर्थनार्थ व्यापक वैचारिक अधिष्ठान तयार करता करता जोशींनी एकूणच मानवी इतिहासाची एक आगळी अशी मांडणी केली. ही मांडणी शेतकरी आंदोलनाच्या काळात पूर्णत्वाला गेली असली, तरी बीजरूपाने ती त्यांच्या मनात खूप पूर्वीपासूनच – अगदी कोल्हापूरमधल्या प्राध्यापकी दिवसांपासूनच – रुजली असावी. मुख्यतः त्यांच्याच शब्दांत ती साधारण पुढीलप्रमाणे आहे :
 शेतीचा शोध ही एक फार मोठी क्रांती होती. पंचमहाभूतांच्या लक्षावधी वर्षांच्या साठलेल्या ऊर्जा माणसाच्या श्रमांचा स्पर्श होताच गुणाकार करीत फळाला येतात. एका दाण्यातून शंभर दाणे तयार होण्याचा चमत्कार शेतीतच होतो. उपभोग्य वस्तूंचा गुणाकार करणारा हा एकमेव व्यवसाय. व्यापार, वाहतूक, कारखानदारी यांसारख्या अन्य कुठल्याही व्यवसायात हे घडत नाही. तिथे फक्त वस्तूंची देवाणघेवाण होते, देवघेवीच्या मूल्याची (exchange valueची) वृद्धी होते. ज्या दिवशी हा गुणाकार माणसाच्या लक्षात आला, त्या दिवसापासून संस्कृतीची रुजवात व्हायला सरुवात झाली.
 जगातील पहिला व्यवसाय शेती हाच आहे. प्रकृती आणि माणूस एकत्र आल्यानंतर केव्हातरी दहा-बारा हजार वर्षांपूर्वी तो निर्माण झाला. हळूहळू अन्न शिजवायचा शोध लागला. खाण्यापिण्याची रेलचेल झाली. बायबलमध्ये वर्णन केलेल्या इडन गार्डनप्रमाणे स्वर्गसदृश परिस्थिती तयार झाली. मानवी समाजाला प्रथमतः स्थैर्य प्राप्त झाले; शिकार करण्यासाठी वा


२२२ ◼ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा