पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



आपले नवे सरदार सगळे या नव्या पिढीतून येणार आहेत.'
 प्रशिक्षण शिबिरातील भाषणांच्या शब्दांकनाचे एखादे पुस्तक व्हावे असे म्हात्रे यांचे म्हणणे होते व 'आंदोलनासाठी नवे सरदार' घडवण्याच्या संदर्भात हे प्रस्तावित पुस्तक महत्त्वाचे ठरू शकेल हेही जोशांना जाणवले. फेब्रुवारी १९८२मध्ये, जोशी यांनी रायगड जिल्ह्यातील पेण व अलिबाग तालुक्यांचा दौरा केला त्यावेळी, अंबाजोगाईच्या त्या कॅसेट्स नकलून काढण्यासाठी त्यांनी एकदाच्या म्हात्रेकडे दिल्या. पुढे म्हात्रेनी निगुतीने पूर्णत्वाला नेलेले त्याचे मुद्रित रूप म्हणजेच शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती हे पुस्तक.
 संघटनेमागचा विचार, तिचे उद्दिष्ट, तिचे स्वरूप, तिचा प्रसार, तिच्या उभारणीतील अडचणी व त्यावरील मार्ग, तिची आंदोलने, तिचे टीकाकार, काळाच्या संदर्भातील तिचे महत्त्व, तिच्या मर्यादा वगैरे अनेक महत्त्वाच्या पैलूंवरील शरद जोशींच्या विचारांचे हे शब्दरूप आहे. ह्या विचारांची समग्रतेने मांडणी करणारे दुसरे कुठलेही पुस्तक त्याकाळात उपलब्ध नव्हते व आजही नाही. ह्या पुस्तकात घालून दिलेली विचारांची बैठक आजही बहुतांशी कायम आहे. 'शेतकरी संघटनेची गीता' असेच ह्या पुस्तकाबद्दल म्हणता येईल.
 पुस्तकात लिहिल्याप्रमाणे शिबिराच्या सुरुवातीलाच जोशी आपल्या पूर्वसुरींचे ऋण मनमोकळेपणे मान्य करतात. पहिल्या घावाने वृक्ष कोसळताना दिसत नाही, शंभराव्या घावाने तो कोसळतो; पण प्रत्यक्षात शंभरावा घाव जितका मारतो तितकाच पहिला घावही मारतो,' ह्या विनोबांच्या मताशी जोशी सहमत आहेत असे दिसते. कार्यकर्त्यांना ते सांगतात :
 "महाराष्ट्रातलं जुन्यातलं जुनं शेतकरी आंदोलन म्हणजे तंट्या भिल्लाचं आंदोलन. त्याकाळी कुळांवरील अन्याय फार असह्य झाले होते. सावकारी पाश भयानक झाले होते. रयतेला काय करावं सुचेनासं झालं होतं. त्यावेळी खूप चिडलेल्या तंट्या भिल्लाने सावकार व व्यापारी यांच्या घरांवर दरोडे घालायला सुरुवात केली. शेतकऱ्यांच्या पिळवणुकीचा प्रश्न अशा त-हेने मांडणारा हा दरोडेखोर जेव्हा हैद्राबाद राज्यात पकडला गेला, तेव्हा त्याला इतर दरोडेखोरांप्रमाणे फाशी दिलं गेलं नाही; एका खड्ड्यात चुन्याची कळी घालून, त्यात तंट्याला ठेवून, वरून पाणी ओतलं गेलं. कारण राज्यकर्त्यांनी ओळखलं होतं, की हा साधासुधा दरोडेखोर नसून शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचा प्रश्न तो मांडतो आहे.
 "१८५७च्या स्वातंत्र्यसमरानंतर चारपाच वर्षांत शेतकऱ्यांचं एक महत्त्वाचं आंदोलन इथे महाराष्ट्रात झालं. १८६१ साली, म्हणजे जवळजवळ सव्वाशे वर्षांपूर्वी, तीन हजार शेतकऱ्यांना अटक झाली होती. वासुदेव बळवंत फडके, जोतीबा फुले यांनीही शेतकऱ्यांच्या दारिद्र्यावर विचार मांडले. आपण तेच विचार नव्या भाषेत मांडत आहोत. स्वातंत्र्याआधी व नंतर कूळकायदे झाले त्याची चळवळ, स्वातंत्र्यानंतरची सहकारी चळवळ या सर्व चळवळींनी आपलं एकेक पाउल पुढे टाकलं. लहान मूल जसं सुरुवातीला पडतपडत चालायला शिकतं, तसंच शेतकऱ्यांनी जो आधार सापडला तो पकडत पकडत पुढे जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्हीच काय ते जागती करणारे अशा त-हेचा अहंकार कार्यकर्त्यांनी बाळगू नये."


२२० ◼ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा