पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


शेतकरी संघटना – तत्त्वज्ञान आणि उभारणी


 चाकणचे कांदा आंदोलन व नंतर नाशिकचे ऊस आंदोलन यांचा अनुभव गाठीशी आल्यानंतर शेतकरी संघटना बळकट पायावर उभी करण्याची गरज जोशींना भासू लागली. त्या दृष्टीने निपाणीच्या तंबाखू आंदोलनापूर्वीच त्यांनी आपल्या निवडक कार्यकर्त्यांची तीन शिबिरे घेतली होती. पहिले शिबिर एप्रिल १९८० मध्ये आळंदीला झाले होते. ऊस आंदोलनाबद्दल लिहिताना मागे त्याचा उल्लेख झालाच आहे.
 दुसरे शिबिर वर्धा येथे १ जानेवारी १९८१ रोजी झाले. त्याला १०० कार्यकर्ते हजर होते. ते शिबिर भरवण्यात विदर्भातील संघटनेचे नेते विजय जावंधिया आणि रवी काशीकर यांचा विशेष पुढाकार होता. अर्थशास्त्र, संघटना आणि आंदोलन ह्या तीन विषयांची इथे चर्चा झाली. चर्चेचे ध्वनिमुद्रण केले गेले होते व या कॅसेट्स सावकाश ऐकत त्यांचे शब्दांकन करायचे क्लिष्ट काम लीलाताई जोशी यांनी स्वतः सुरू केले होते. दर्दैवाने ते पूर्ण होण्यापूर्वीच लीलाताई हे जग अकालीच सोडून गेल्या होत्या. पुढे अलिबागचे प्रा. सुरेश घाटे (अ. वा. कुळकर्णी आणि सुरेशचंद्र म्हात्रे यांचे एक सहकारी) यांनी ते पूर्ण केले व भारतीय शेतीची पराधीनता या शीर्षकाखालील एका ४०-पानी पुस्तिकेच्या स्वरूपात त्याचे मुद्रणही केले. ती पुस्तिका घाटे यांनी लीलाताईंच्या स्मृतीलाच अर्पण केली होती. या शिबिरातील चर्चा शिबिरार्थांना खूप उपयुक्त वाटली होती, पण त्याचवेळी काहीशी अपुरीही वाटली होती. मुख्य म्हणजे शिबिरासाठी एकूण वेळ खूप कमी पडला होता.
 त्यामुळे मग निवडक ५० कार्यकर्त्यांसाठी तिसरे शिबिर बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे २६ व २७ फेब्रुवारी १९८१ रोजी घेतले गेले. विषयाची अधिक बारकाईने चर्चा करणे व त्यातून कार्यकर्त्यांची बौद्धिक पूर्वपीठिका तयार करणे हा त्यामागचा उद्देश होता. मोरेवाडीचे श्रीरंगनाना मोरे ह्यांच्या साहाय्याने हे तिसरे शिबीर घेतले गेले. श्रीरंगनाना हे शेतकरी चळवळीत खरेतर शरद जोशी यांच्या आगमनापूर्वीच सक्रिय होते. शेतकऱ्यांसाठी ते भूमिसेवक नावाचे एक पाक्षिकही चालवत असत. त्यांनीच ह्या शिबिरासाठी सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या. ह्या शिबिरातील सर्व चर्चेचेदेखील ध्वनिमुद्रण केले गेले होते, पण ते शब्दबद्ध करायचे काम मात्र कोणी केले नव्हते; त्या कॅसेट्स तशाच पडून होत्या.
 २० सप्टेंबर १९८१ रोजी पिंपळगाव बसवंत येथे भरलेल्या विराट विजय मेळाव्यात


२१८ ◼ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा