पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



आमच्या चुकीमुळे नव्हे आणि या आक्रमणाला आम्ही सर्व मिळून एकत्र तोंड देऊ, खचून जाणार नाही तर शेतकऱ्यांना याही प्रसंगातून तगून जाण्याकरिता जे सामर्थ्य हवे ते मिळू शकेल असे मला वाटते.

 जोशींच्या मते तसे सगळ्याच शेतीमालाचे शोषण होते, पण कापसाचे शोषण त्या सर्वांत विशेष क्रूर आहे. मनुष्याच्या अन्नपाण्याची एकदा सोय लागली, की त्याची सर्वांत मोठी गरज अंगभर वस्त्राची असते. साहजिकच पहिली कारखानदारी उभी राहिली ती कापड गिरण्यांची आणि सर्वांत जास्त शोषण झाले ते कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्याचे. इंग्रजांच्या साम्राज्याचे मूळ उद्दिष्ट कापसाच्या शोषणाचे होते. गांधीजींनी त्याविरुद्ध लढा उभा केला तो चरख्याची निशाणी घेऊन आणि खादीचा कार्यक्रम घेऊन. या एकाच गोष्टीत सगळे कापसाचे राजकारण आणि तत्त्वज्ञान सामावलेले आहे. १९४७ साली गोरा इंग्रज गेला, पण त्या जागी काळा इंग्रज आला; शेतकऱ्यांचे शोषण चालूच राहिले.
  कापसाचा भाव बुडवण्यासाठी सरकारने काय काय नाही केले? निर्यातीवर जवळजवळ कायम बंदी ठेवली. जरा काही शेतकऱ्यांना बरा भाव मिळेल असे दिसले, की बाहेरून कापूस आणायची मात्र तत्परतेने व्यवस्था केली व देशांतर्गत कापसाचे भाव पाडले; शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवला. हे सगळे करताना त्यांनी आपण हातमागधारकांचे हितरक्षण करतो आहोत असा आव आणला. हातमागधारकांची एकूण सगळी गरजच मुळी केवळ चार लाख गाठींची होती. त्यांना तेवढा कापूस स्वस्त मिळावा, याकरिता कितीतरी अधिक सुटसुटीत व्यवस्था करता आली असती; पण त्यांना त्यांची चार लाख गाठी रुई स्वस्त द्यायचा बहाणा करत, त्याच्या पंचवीसपट असलेला १०० लाख गाठींचा बाजार शासनाने वर्षानुवर्षे उद्ध्वस्त केला.<
 जोशी म्हणतात, "जखमांमधून वाहणारे रक्त थांबावे म्हणून कापूस लावला जातो, पण शेतीच्या कापसातून वर्षानुवर्षे रक्त वाहतच राहिले आहे."
 शेतकरी संघटनेचे काम सर्व महाराष्ट्रभर पसरले ते कापूस आंदोलनामुळे. कांदा, ऊस, तंबाखू ही त्यामानाने छोटी पिके; कापसाचे क्षेत्र मात्र खूप विशाल. जवळ जवळ सगळा विदर्भ आणि बराचसा मराठवाडा व्यापणारे. कापसावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी कुटुंबांची संख्याही खूप मोठी. शेतकरी संघटनेच्या सभांना होणारी सर्वाधिक गर्दी कापूस शेतकऱ्यांची असे आणि संघटनेचे सर्वाधिक कार्यकर्तेदेखील कापूसक्षेत्रातून आले. शरद जोशींच्या आयुष्यातील आंदोलनपर्वाचा मोठा हिस्सा कापसाने व्यापलेला आहे.

 
पांढरे सोने, लाल कापूस ◼ २१७