पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



मालमत्ता जप्त करणे हे सर्वथा गैर आहे. तशी कर्जवसुली बेकायदेशीर ठरवली जावी. चक्रवाढ दराने व्याज आकारणे हाही दखलपात्र गुन्हा ठरवण्यात यावा. खरे तर या सर्वजुन्या कर्जापासून त्याला मुक्त करायला हवे.

२) ज्याला शेतीव्यवसाय सोडायचा आहे त्याला आपली शेतजमीन विकता येईल आणि ज्याला शेतीव्यवसाय नव्याने सुरू करण्याची इच्छा व आर्थिक कुवत आहे त्याला तशी शेतजमीन विकत घेता येईल, अशी व्यवस्था करायला हवी. कोणीही शहरी उद्योजक एक व्यवसाय म्हणून आज शेतीकडे वळणार नाही. त्यासाठी काही कायदेही बदलावे लागतील. आज शेतजमिनीची विक्री वा खरेदी खुप किचकट बनली आहे. केवळ वाडवडलांपासून चालत आलेली घरची शेती आहे म्हणून नाइलाजाने शेती करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. अन्य व्यवसायांप्रमाणे शेतीतही बाहेर पडायचा मार्ग (Exit Route) ठेवला तर शेतकरी आजच्याइतका अगतिक राहणार नाही. प्रचंड वाढलेला औषधोपचारांचा खर्च किंवा मुलांच्या शिक्षणाचा खर्च किंवा मुलांना टेम्पो वा रिक्क्षा टाकणे यांसारखा एखादा पर्यायी व्यवसाय करता यावा किंवा नोकरी करता यावी, यासाठी करायचा खर्च वगैरेंचे आकडे आज फार मोठे आहेत. मुख्यतः त्यासाठी कर्ज काढावे लागते आणि ते फेडणे अशक्य होऊन बसते. त्याच्या अगतिकपणाच्या भावनेतूनच आत्महत्येचा पर्याय पुढे येतो. ती अगतिकता दूर करायची असेल, तर त्याच्यापुढे अर्थार्जनाचे शक्य कोटीतले व त्याला झेपणारे पर्यायही उपलब्ध व्हायला हवेत. आज शेतकऱ्यांपुढे ते पर्याय आढळत नाहीत. या नरकातून आपण सुटूच शकत नाही' या भावनेने तो अधिकच खचून जातो.

३) मरणाच्या सीमेवर पोचलेल्या शेतकऱ्याचा आक्रोश ऐकला जाण्याची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. उदाहरणार्थ, प्रत्येक तालुक्यात हेल्पलाइन सुरू करावी. वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी आत्महत्या ह्या प्रकाराचा भरपूर अभ्यास केला आहे. त्यांनी काढलेला एक निष्कर्ष असा आहे, की आत्महत्या करण्याची ऊर्मी ही क्षणिक असते. माणसाला क्षणभर आलेल्या विफलतेच्या भरात तो काय वाटेल ते करून जातो. पण तो विशिष्ट क्षण जर का कोणत्याही कारणाने आणि कोणत्याही पद्धतीने टाळता आला, तर आत्महत्या टळू शकते.

४) शेतकऱ्याचा आत्मसम्मान जागृत करणे हा आत्महत्या थांबवण्याचा सर्वांत महत्वाचा उपाय आहे. त्यासाठी त्याला सबसिडीच्या बेड्यांत जखडून टाकणे हा उपाय नाही; त्याच्या मालाला वाजवी भाव मिळेल अशी यंत्रणा उभी करणे हे सर्वांत महत्त्वाचे आहे. तो शेतीत खचत गेला ह्याला इतर कोणत्याही कारणापेक्षा सातत्याने दिला गेलेला कमी भाव व त्याद्वारे पिढ्यानपिढ्या झालेली सरकारी पिळवणूक हे सर्वाधिक मोठे कारण आहे. ती पिळवणूक थांबवावी म्हणून लढा उभारण्यासाठी त्याचे आत्मबळ वाढवायला हवे. सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून जर अशी प्रतिज्ञा केली की, 'आम्ही बुडालो ते


२१६ ◼ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा