पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "अशा प्रकारे आंदोलक पुढे पुढे जायचे आणि मग सरळ रेल्वे लाइनवर जाऊन आडवे पडायचे. ती सगळी बॅच पोलिसांनी पकडली, की रेल्वे ट्रॅकवर आणखी कुठेतरी कुठूनतरी दुसरी बॅच आडवी पडायची. आश्रमात माझ्याबरोबर राहणाऱ्या अनेक जणांनी मला नंतर सांगितलं, की गांधीजींच्या वेळेलाही इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक आंदोलनात सामील झाले नव्हते."
 "तुमच्यासारख्या घरंदाज कुटुंबातील व विशेषतः ग्रामीण भागातील स्त्रियांनी असं रस्त्यावर उतरणं खूपच अवघड व दुर्मिळ आहे. ह्यावेळी तुम्ही सगळे असे इतके पेटून कसे उठलात? गांधीजींच्या त्या आंदोलनात आणि ह्या आंदोलनात असा काय फरक होता?" असा प्रश्न मी सुमनताईंना विचारला.
 त्याचे त्यावेळी त्यांनी काही उत्तर दिले नाही, पण दुसऱ्या दिवशी मी नागपूरला परत जात असताना त्यांचा फोन आला. त्या म्हणाल्या,
  “एक फार मोठा फरक म्हणजे त्यावेळी लोक देशसेवा म्हणून आंदोलनात सामील होत असत. पुढे जेपी आंदोलनातदेखील आम्ही सामील होतो व तेव्हाही आमची प्रेरणा देशसेवा हीच होती. किंवा समाजसेवा म्हणा हवं तर. पण ह्या शेतकरी आंदोलनात आम्ही दुसऱ्या कोणाची सेवा करायची म्हणून रस्त्यावर उतरलो नव्हतो. इथे प्रश्न होता तो आमच्या स्वतःचाच. आम्ही स्वतः जे शेतीत कष्ट घेत होतो, त्याचं फळ आम्हाला मिळत नव्हतं व ते मिळावं म्हणून आमचं आंदोलन होतं. ह्यावेळी प्रश्न आमच्या स्वतःचा होता, स्वहिताचा होता. त्यामुळे आम्ही जिवाची पर्वा न करता इतके पेटून उठलो."
  त्यांचे हे उत्तर माणसाला कार्यप्रवण करणारी मूलभूत प्रेरणा कोणती हे स्पष्ट करणारे होते व म्हणूनच विचार करायला भाग पाडणारे होते.
 ह्या रेल रोकोत थेट व महत्त्वाचा सहभाग असलेल्या सरोजताई काशीकर याही या वर्धाभेटीत आमच्याबरोबर होत्या. शरद जोशी व शेतकरी आंदोलन यांच्याशी त्यांचा व त्यांच्या सर्व कुटुंबाचाच खुप जिव्हाळ्याचा संबंध राहिला आहे.
 सरोज काशीकर मूळच्या मध्यप्रदेशातल्या. पुढे त्यांचे घराणे नागपुरात स्थायिक झाले. त्यांचे आजोबा गौरीशंकर शुक्ला संतपुरुष म्हणून प्रसिद्ध होते. सरोजताई अर्थशास्त्राच्या पदवीधर. माहेरचा विरोध पत्करूनही वर्ध्याच्या रवी काशीकर यांच्याशी त्यांनी विवाह केला. १९८१ साली जोशी प्रथम वर्ध्याला आले होते. त्यांच्यासोबत पत्नी लीलाताईदेखील होत्या. त्यांची मुक्कामाची सोय कुठे करायची, यावर स्थानिक कार्यकर्त्यांत चर्चा झाली व सर्वानुमते त्यांना काशीकरांच्या घरी ठेवायचे ठरले. त्यावेळी घर तसे साधे होते. त्यात एकत्र कुटुंबपद्धती. घरात माणसे बरीच. तरीही शेवटी वरच्या पत्र्याचे छप्पर असलेल्या खोलीत पाहुण्यांची सोय केली गेली.
 जोशींच्या साध्या सवयी लौकरच सरोजताईंच्या लक्षात आल्या आणि त्यांना घरी ठेवायचे म्हटल्यावर आधी आलेला तणाव कुठच्या कुठे पळून गेला. त्यानंतर अनेक वेळा


२०६ ◼ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा