पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



धोका देत होतं! घरात नवऱ्याबरोबर बाचाबाची करण्यात काही अर्थ नव्हता; आम्ही दोघंही फसलो होतो. आम्हीच काय, सर्व शेतकरी फसले होते.

मला कळलेलं हे सत्य गावागावात शेतकऱ्यांपर्यंत पोचवलं पाहिजे, म्हणून बरोबर दोन बायांना घेऊन विदर्भातील चार जिल्ह्यांची पदयात्रा काढली. त्यावेळी मी ग्रामीण दारिद्र्य जवळून पाहिलं. त्यानंतर मी घरी बसूच शकले नाही. अनेक गावी पायी फिरले. त्या अनुभवांची शिदोरी आयुष्यभर पुरेल.

(चतुरंग प्रतिष्ठान, दैनंदिनी २०१२, पृष्ठ १३५-६-७)


  आश्रमवासी असल्याने सुमनताई स्वतः राजीवस्त्र वापरतच नव्हत्या; खादीचेच कपडे घालायच्या. आमच्याबरोबर आंदोलनस्थळ दाखवायला त्या आल्या. रेल्वे लाइन एका लांबलचक उंचवट्यावरून जाते. तिथवर जायची वाट त्यांच्याच शेतातून जाते. त्या दिवसाच्या आठवणी सांगताना त्या म्हणाल्या,

 "सगळीकडे पोलीस पहारा जबरदस्त होता, कोणालाही रेल्वे लाइनपर्यंत सोडत नव्हते. जरा जवळ जायचा प्रयत्न केला की पकडून नेत होते. आधीही अनेक आंदोलनांत भाग घेतलेला असल्याने मला पोलिसांची भीती अशी फारशी नव्हती. रेल रोकोच्या आदल्याच आठवड्यात मलाही पोलिसांनी पकडलं होतं. त्यांच्या व्हॅनमध्ये बसवलं. मला बाहेर पडायचं होतं.पण पोलीस दार उघडेनात. शेवटी जोरजोरात लाथा मारून मी स्वतःच ते दार तोडलं व बाहेर आले. बघते तो काय, समोर एका कार्यकर्त्याला पोलीस लाठ्यांनी बेदम मारत होते. मला ते बघवेना. त्याला सोडवायला मी मध्ये पडले, तर मलाही दोन लाठ्या खाव्या लागल्या. आमच्या रेल रोको आंदोलनात पोलिसांनी केलेला बेछूट लाठीमार आठवला, की आजही माझ्या अंगावर शहारे उठतात.

 "पोलिसांच्या तावडीतून निसटून मी धूम पळाले. कारण आमच्यापैकी काही जणींनी तरी बाहेर राहणे आवश्यक होते. त्याशिवाय बाहेरगावाहून येणाऱ्या आंदोलकांना आम्ही कुठल्या कुठल्या जागी जमायचं व रेल्वे अडवायची ह्याचे निरोप देऊ शकलो नसतो. मोबाइल नसतानाचे हे दिवस होते. आमच्या बऱ्याच महिला कार्यकर्त्या चलाख होत्या. थोडे थोडे पुढे सरकत त्या रेल्वे लाइनच्या अगदी जवळ जाऊन पोचल्या. मध्ये दोन-तीनदा पोलिसांनी हटकलं तेव्हा, 'आम्ही कापूस वेचायला आलो आहोत' असं म्हणत त्यांनी शेतातला कापूस वेचण्याचं नाटक सुरू केलं.
 “एका शेतकऱ्याचं पाच-सहा एकराचं कोबीचं शेत रेल्वे रूळ व रस्ता ह्याच्यामध्ये होतं. शेताला वळसा घालून गेलं, तर पोलिसांना दिसणार आणि ते नक्की पकडणार हे उघड होतं. अशावेळी तो शेतकरी आपणहूनच पुढे आला आणि त्या उभ्या शेतातूनच रेल्वेपर्यंत जायची त्याने आंदोलकांना परवानगी दिली. असं करण्यात त्याच्या कोबीचं नुकसान होणार होतं, पण त्याला त्याची पर्वा नव्हती. सर्वच शेतकऱ्यांची आणि गावकऱ्यांची सगळी सहानुभूती आम्हालाच होती. त्यामुळेच गनिमी काव्याने हालचाली करणं आम्हाला शक्य होतं.

पांढरे सोने, लाल कापूस ◼ २०५