पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

सेगावच्या रेल्वे स्टेशनला पूर्वी वर्धा (पूर्व) असे म्हणत. त्याचेही नाव पुढे सेवाग्राम ठेवले गेले. वर्धा ते सेवाग्राम ह्या टप्प्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे भारतीय रेल्वेवरील सर्वांत अधिक अवघड वळणे (sharpest turns) ह्या आठ किलोमीटरच्या टप्प्यात आहेत.
 रेल्वे लाइनीच्या दोन्ही बाजूंना मुख्यतः कापसाची शेते आहेत, पूर्वीही होती. १२ डिसेंबरला रास्ता रोको होणार, पण त्याच्या आदल्याच आठवड्यात हजारो शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. खुद्द वर्ध्यात जिल्हा कचेरीच्या बाजूला असलेल्या विस्तीर्ण पटांगणात बांबूचे कठडे उभारून एक खुला तुरुंग केला गेला होता व ह्या आंदोलकांना जनावरांप्रमाणे त्यात नुसते सोडून देण्यात येत होते. त्यांचा नाव-पत्ता नोंदवून घेऊन.
 सेवाग्राम येथे हे जे रेल रोको आंदोलन झाले ती जागा प्रत्यक्ष बघण्याचा योग प्रस्तुत लेखकाला २८ मार्च २०१६ रोजी आला. प्रत्यक्ष रेल रोकोत भाग घेतलेल्या काही जणांशी त्यासंदर्भात त्यावेळी चर्चाही करता आली. रेल रोको जिथे झाले तिथून अगदी जवळच ज्यांचे शेत व राहण्याचे घर आहे आणि ज्यांचा आंदोलनात उत्साही सहभाग होता त्या सुमनताई अगरवाल यांनाही भेटता आले.
 सुमनताई अगरवाल ह्या मूळ कर्नाटकच्या. विनोबाजींच्या ब्रह्मविद्या आश्रमातील राधेश्यामजी यांच्याशी त्यांनी लग्न केले. दोघेही आश्रमातच राहू लागले. पुढे दोघांनी आश्रमाबाहेर स्वत:च्या घरात राहायचा निर्णय घेतला आणि १९७३च्या मार्चमध्ये स्वतःची शेती करायला सुरुवात केली. खूप खर्च केला. दोघेही खूप मेहनत घ्यायचे. पण काहीच पैसा सुटत नसे. आपले अनुभव सांगताना त्या लिहितात,

शेतीत आपण कठे कमी पडतो तेच कळायचं नाही. त्यावरून आमच्यात भांडणंही व्हायची. पावलापावलावर टंचाई. घरातील शांती बिघडत चालली होती. दोघांमध्ये शाब्दिक संघर्षाला सुरुवात झाली होती. शरीर एवढं थकायचं, की जेवण झाल्यावर आवराआवर करणंसुद्धा नकोसं व्हायचं.१९८४च्या सुमारास शेतकरी संघटनेच्या परभणी अधिवेशनासाठी वर्ध्याहून एक बस जाणार होती. बसमध्ये एक जागा रिकामी आहे, तुम्ही येता का?' असं विचारायला शेजारचा शेतकरी घरी आला. संत्र्याचा ट्रक भरण्याच्या कामासाठी राधेश्यामजी घरीच होते. ते तर जाऊ शकत नव्हते. 'तू जाऊन ये' असं ते मला म्हणाले. मी गेले. तोवर मला संघटनेविषयी काहीच माहिती नव्हती.

परभणीतील शेतकरी नेत्यांची भाषणं मला आवडली. पुढे चांदवडच्या महिला अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी आंबेठाणला भरलेल्या एक आठवड्याच्या महिला शिबिरालाही मी हजर होते. संघटनेने मांडलेले विचार मला नवीनच होते. आम्ही शेतीमध्ये मूर्खासारखं काम करत होतो, आज ना उद्या चांगलं होईल अशी आशा वाटत होती; पण ज्या सरकारवर आम्ही विसंबून होतो, ते शेतकऱ्यांना केवढा मोठा


२०४ ◼ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा