पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



ती चौकशी केली. पण त्या चौकशीतून शेतकरीनेत्यांना समाधानकारक वाटावे असे फारसे काहीच निष्पन्न झाले नाही.
 या घटनेपूर्वी ७ डिसेंबर १९८६ रोजी तुरुंगातूनच जोशींनी जाहीर केले होते, की ह्या सप्ताहाचा शेवट रेल रोकोने करायचे आपले पूर्वीच ठरले आहे व त्यानुसार १२ डिसेंबर रोजी सेवाग्राम येथे तीन तासांचे रेल रोको होईल. वर्ध्याजवळचे सेवाग्राम हे स्टेशन तसे देशाच्या मध्यावर आहे व अनेक महत्त्वाच्या गाड्या ह्याच मार्गावरून जातात.
 पोलिसांनी जागोजागी नाकाबंदी करून शेतकऱ्यांना अटक करायचा कसोशीने प्रयत्न केला, पण तरीही आपला गनिमी कावा लढवून, इतर प्रमुख नेते तुरुंगात असूनही वीस-पंचवीस हजार शेतकरी वेगवेगळ्या छुप्या मार्गांनी रेल रोकोसाठी निवडलेल्या वेगवेगळ्या जागी हजर झाले व त्यांनी तीन तास रेल्वे अडवून धरली. पोलीस बंदोबस्त प्रचंड होता. एक गट पोलिसांनी ताब्यात घेतला व पोलीस गाडीत वा बसमध्ये बसवून तुरुंगाकडे रवाना केला, की लगेच दुसरा गट कुठूनतरी रेल्वे रुळांवर उगवत होता व पोलीस लगेच त्या गटामागे धावत होते. सत्याग्रहींनी भरलेल्या बसेसच्या रांगाच्या रांगा अशा उभ्या होत्या. शेतांत लपून, छुप्या वाटा शोधत हे शेतकरी आंदोलनस्थळी कसे दाखल झाले याचे खुद्द पोलिसांना अतिशय आश्चर्य वाटले. 'भुईतन उगवावेत तसे हे शेतकऱ्यांचे लोंढेच्या लोंढे आंदोलनस्थळी प्रकट होत होते' असे वर्णन खुद्द पोलिसांनी कोर्टासमोर केले आहे.

 वर्ध्यापासून जेमतेम आठ किलोमीटरवर सेवाग्राम आहे. गांधीजींच्या आश्रमामुळे जगप्रसिद्ध झालेले. १९३० साली अहमदाबादच्या साबरमती आश्रमातून गांधीजींनी दांडीयात्रा सुरू केली. 'भारत स्वतंत्र झाल्याशिवाय आता मी पुन्हा साबरमतीला येणार नाही' अशी प्रतिज्ञा करून. नंतरची दोन वर्षे ते तुरुंगातच होते. बाहेर आल्यावर मध्य भारतात कुठेतरी आपण कायमचे वास्तव्य करावे असे त्यांनी ठरवले. १९३६ साली सुप्रसिद्ध उद्योगपती आणि ज्यांना गांधीजी आपला पाचवा पुत्र मानत, त्या जमनालाल बजाज यांनी गांधीजींना वर्धा येथील आपल्या बजाजवाडी ह्या निवासस्थानी यायचे आमंत्रण दिले. हे स्थळ भारताच्या जवळजवळ मध्यावर आहे हे गांधीजींच्या लक्षात आले. त्यावेळी गांधीजी ६७ वर्षांचे होते. इथेच आपला एक नवा आश्रम सुरू करायचे त्यांनी ठरवले. सेवाग्राम या नावाने. कस्तुरबाही त्यांच्यासमवेत होत्या. इतरही अनेक कार्यकर्ते होते. या सर्वांना तिथे नीट राहता यावे म्हणून जमनालाल यांनी गांधीजींना आपली ३०० एकर जमीन दिली. ती ज्या गावी होती त्याचे नाव होते सेगाव. त्याच्याशी नामसादृश्य असलेले शेगाव हे तीर्थक्षेत्र विदर्भात अतिशय प्रसिद्ध आहे. श्री गजानन महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेले. गांधीजींना 'सेगाव'च्या पत्त्यावर देशभरातून येणारी असंख्य पत्रे चुकून 'शेगावला जात. म्हणून मग १९४० साली 'सेगावचे नाव बदलून 'सेवाग्राम' हेच ठेवले गेले. १९३६ ते १९४८ साली निधन होईस्तोवर गांधीजींचे कायमस्वरूपी 'घर' हेच होते. पुढे विनोबा यांचेही वास्तव्य इथे झाले. १९५१ साली त्यांची भूदान यात्रा इथूनच सुरू झाली. नंतर विनोबांनी पवनार येथेही काही वर्षे वास्तव्य केले.

पांढरे सोने, लाल कापूस ◼ २०३