पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



बसले. तिथे असणारा एक कंपाउंडर मला म्हणाला, 'बाई, तुम्ही जा, इथे बसू नका. आम्ही काही तुमचे नोकर नाही गोळी काढायला.' तो असं म्हणाल्यावर मी उठले. गावच्या माणसांना म्हणाले, 'डॉक्टर गोळी काढायला तयार नाही, मी काय करू?' ती माणसं म्हणाली, 'गोदाबाई, गावाकडं जाऊ. एखाद्या खासगी डॉक्टरला बोलावून आणू अन् गोळी काढू.' मग मी त्यांच्याबरोबर पायी अडीच कोस चालत आले. घरी आल्यावर दम वर निघून जात होता. मग गावातल्याच डॉक्टरनं गोळी काढली. आजही त्या दिवसाची आठवण झाली, की गिरकी आल्यासारखं होतं अन् अंग आपोआपच थरथरायला होतं.

दुसरे निवेदन आहे हिंगोली गावच्या अंजली अरुण पातुरकर यांचे. त्या म्हणतात :

२३ नोव्हेंबर, ७ डिसेंबर आणि १० डिसेंबर १९८६ रोजी सुरेगाव येथे कापूस आंदोलने झाली. ह्या तिन्ही आंदोलनांत मी भाग घेतला होता. २३ नोव्हेंबर आणि ७ डिसेंबरच्या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने स्त्रिया रस्त्यावर आल्या होत्या. छोट्या पोराबाळांनासुद्धा घेऊन, एका घरात एक बाई असेल, तर त्या घरातील नवरा, बायको व मुले हे सर्वच रस्त्यावर आले होते. ज्या घरात सासू व सुना किंवा मुली आहेत, अशा घरातील किमान दोन स्त्रिया तरी रस्त्यावर आल्या होत्या. त्यांचा उत्साह दांडगा. त्या म्हणाल्या, की दहा तारखेला घराला कुलूप लावून घरातील सर्व व्यक्ती रस्त्यावर येऊ.

अशा उत्साही वातावरणात दहा तारखेला सकाळी नऊ वाजता आम्ही रस्त्यावर आलो. सर्व शेतकरी जमायला बारा वाजले असते, कारण खेड्यापाड्यातून तिथे शेतकरी जमणार होते. दहा वाजेपर्यंत पाचशेच्या आसपास स्त्रिया व पुरुष तिथे जमले. पोलीस फार मोठ्या संख्येने तिथे जमले होते. लोक जमेपर्यंत काय करायचे, म्हणून श्रीयुत मिसाळ यांनी शेतकरी संघटनेचे एक गाणे म्हटले. तेथील सर्व स्त्रियांनी मला बोलावयास लावले. मी पाच मिनिटेच बोलले. माझ्यानंतर बळीरामजी क-हाळे यांनी बोलावयास सुरुवात केली. परंतु तोपर्यंत पोलिसांत काहीतरी कुजबुज झाली आणि त्यांनी लगेचच शेतकऱ्यांची धरपकड करून लाठ्या मारण्यास सुरुवात केली. शेतकरी घाबरून इकडेतिकडे पळू लागले, तर त्यांनी गोळीबार सुरू केला. सर्व आंदोलन चिरडून टाकले. त्या आंदोलनात तीन शेतकऱ्यांना हौतात्म्य पत्करावे लागले. पोलिसांनी अगदी धुमाकूळ घातला. महिलांनासुद्धा गोळ्या लागल्या. मला दहा-पंधरा लाठ्यांचा प्रसाद मिळाला.

  विधानसभेच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सुरेगाव येथील पोलिसांच्या अत्याचाराबद्दल दोन तास बरीच चर्चा झाली. शेवटी तिच्यात हस्तक्षेप करून मुख्यमंत्र्यांना न्यायालयीन चौकशी जाहीर करावी लागली. मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती मालवणकर यांनी


२०२ ◼ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा