पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



तसाच काहीसा 'राजीवस्त्र' हा गमतीदार शब्द तयार झाला होता.
  या आंदोलनासाठी जोशी यांनी व्यक्तिशः प्रयत्नांची पराकाष्ठा केली. गावागावात प्रचार केला. कृत्रिम बनावटीच्या कापडावर म्हणजेच राजीवस्त्रांवर बहिष्कार टाकायचा व त्याची ठिकठिकाणी होळी करायची असे त्या आंदोलनाचे स्वरूप ठरले. ती कल्पना त्यांचीच होती. जोशी स्वतः नेहमीच कॉटनचे कपडे वापरत. आंदोलनाचा प्रचार करण्यासाठी त-हेत-हेची पोस्टर्स तयार करणे, घोषणा तयार करणे, वेगवेगळ्या संघटनाशी चर्चा करून त्यांनीही सहभागी व्हावे म्हणून प्रयत्न करणे ह्यासाठी ते तासनतास, दिवसेंदिवस स्वतः खपत होते. आताच्या परिस्थितीत राजीव गांधी यांच्याविरोधात काही भूमिका घेणे म्हणजे प्रवाहाविरुद्ध पोहणे आहे याची त्यांना पूर्ण कल्पना होती. आपल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ त्यांनी म्हटले होते,

आपल्या देशाच्या स्वातंत्र्यचळवळीच्या इतिहासात कापड उद्योगाला मोठे स्थान आहे. ब्रिटिशांची आर्थिक नीती स्पष्ट करताना कापूस स्वस्तात स्वस्त विकत घेऊन कापड महागात महाग विकणे हे उदाहरण सांगितले गेले; स्वदेशी कापडाचा वापर, परदेशी कापडावर बहिष्कार हे कार्यक्रम राबवले गेले. चरखा हे स्वातंत्र्यचळवळीचे चिन्हच झाले. राजीव गांधींचे कापड धोरण म्हणजे महात्मा गांधींच्या कल्पनेतील स्वतंत्र भारताच्या चित्राच्या विरुद्धचे टोक आहे. महात्मा गांधींचे अपुरे राहिलेले स्वातंत्र्यआंदोलन शेतकरी संघटनाच पुढे चालवत आहे असे मी म्हणतो, त्याचे आगामी आंदोलन हे सर्वस्पष्ट उदाहरण आहे. पूर्वी बनावट धाग्यांवर बंधने होती, गिरण्यांनी ८० टक्के धागे कापसाचेच वापरावेत हे बंधन होते. तरीही कापसाला भाव मिळत नव्हता. जेवढ्या काळात कापडाच्या किमतीत ३०० टक्के वाढ झाली, तेवढ्याच काळात कापसाच्या भावात मात्र फक्त ६० टक्के वाढ झाली. आणि आता तर गिरण्यांनी कापूस वापरला नाही तरी चालणार आहे. मग कापसाला योग्य भाव कसे मिळतील?

(शेतकरी संघटक, २० सप्टेंबर १९८५)


  आंदोलनाचा प्रारंभ साहजिकच कापसाचे मोठे पीक जिथे निघते त्या विदर्भात केला गेला; त्यातही पुन्हा तो वर्धा येथे केला गेला. जेथील सेवाग्राममध्ये गांधीजींचे बराच काळ वास्तव्य होते. दिवस होता २ ऑक्टोबर, म्हणजे गांधी जयंतीचा.

 ह्या सगळ्याच आयोजनात एक कल्पकता दिसून येते व आंदोलनाची तयारी किती विचारपूर्वक केली होती हे जाणवते. त्या दिवशी सकाळी जोशींच्या उपस्थितीत बाराशे बैलगाड्यांची एक मिरवणूक काढली गेली व त्यानंतर ४०,००० शेतकऱ्यांचा तिथे मेळावा भरवण्यात आला. मेळाव्यात राजीवस्त्रांची भली मोठी होळी करण्यात आली. त्या दिवशी महाराष्ट्रभर एकूण अडीचशे ठिकाणी अशा होळ्या पेटवण्यात आल्या. आंदोलनाची चर्चा त्यामुळे सर्वतोमुखी झाली.


१९६ = अंगारवाटा... शोध शरद जोशींचा