पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आपला मुलगाच मानत. म्हात्रे सांगत होते, "आपल्या शरदला हा सांभाळेल, असा विश्वास बहुधा त्यांना वाटत होता."
 इंदिराबाई खूप कर्तृत्ववान व कामसू होत्या; सतत काही ना काही चालूच असायचे. बागेतला पालापाचोळा गोळा करणे, घरचे केरवारे, भांडी-धुणी, स्वैपाक वगैरे सगळी कामे त्या स्वतःच करायच्या. लहानसहान दुरुस्तीची कामेही. अधूनमधून मोलकरीण मिळायची, पण त्यांच्या कडक शिस्तीला कंटाळून ती लगेचच काम सोडून द्यायची. त्यामुळेही कदाचित त्यांना सर्व कामे स्वतः करायची सवय लागली असेल. शिवाय कुठलेही काम कसे करायचे ह्याची त्यांची एक पद्धत ठरलेली असायची व तीच पद्धत सर्वोत्तम आहे याविषयी त्यांची खात्री असायची. तसे त्या इतरांना पटवूनही द्यायच्या. कुठलेही काम दुसऱ्या कुठल्या पद्धतीने केलेले त्यांना पसंत पडत नसे. साहजिकच त्यांच्याकडे कोणी नोकर टिकत नसत. पुढे जोशींनी लिहिले आहे, "तिच्याकडे कामाला राहिलेल्या बाया, मोलकरणी यांच्याच कथा लिहायच्या म्हटल्या, तरी तो एक वाचनीय ग्रंथ होऊन जाईल."
 त्यांचे आणखी एक वेगळेपण म्हणजे त्या अगदी करारी व स्वतंत्र बाण्याच्या होत्या. "शिकली असती तर माझी आई एखाद्या कंपनीची मॅनेजिंग डायरेक्टरही सहज झाली असती," असे त्यांचे सध्या नाशिकला राहणारे एक चिरंजीव प्रभाकर ऊर्फ येशू प्रस्तुत लेखकाला म्हणाले होते.
 यजमान वारल्यानंतरही कुठल्याच मुलाकडे न जाता त्यांनी स्वतःच्या घरात एकट्याने राहणेच पसंत केले होते. पुण्यात प्रभात रोडवर, आताच्या आयकर कार्यालयाजवळ पतीने बांधलेल्या 'सदिच्छा' ह्या छोट्या बंगल्यात. आपल्या खासगीपणाची (पर्सनल स्पेसची) कटाक्षाने केलेली जपणूक हे एकूणच जोशी कुटुंबीयांचे एक वेगळेपण असल्याचे जाणवते. जोशी जेव्हा स्वित्झर्लंडहून सहकुटुंब भारतात परतले, तेव्हादेखील स्वतःचे वेगळे घर विकत घेईपर्यंतचे सहाएक आठवडे आईकडे न राहता ते सहकुटुंब डेक्कनवर श्रेयस हॉटेलात राहिले होते. थोरल्या भगिनी नमाताई पुढे म्हातारपणी जबलपूरहून महाराष्ट्रात स्थायिक झाल्या, तेव्हा त्यांनीही चाकणला आपले स्वतंत्र बिहाड थाटले; त्या पुण्यात भावाकडे म्हणजे शरदकडे राहायला आल्या नाहीत.

 १९७० साली अनंतराव वारले. वयाच्या पासष्टाव्या वर्षी. त्यावेळी सुट्टी घेऊन जोशी स्वित्झर्लंडहून पुण्याला आले होते. परत गेल्यावर त्यांनी आईला एका पत्रात लिहिले होते : "काका गेले म्हणजे आता उरलेले आयुष्य कसेबसे काढून संपवायचे आहे, असा विचारही मनात आणू नकोस. अशातही जिद्दीने उभे राहून आयुष्याला एक नवा अर्थ दिला पाहिजे." नंतर या संदर्भात लिहिताना “मी तिला असे लिहिण्याची गरज होती असे नाही; मी न लिहिताही तिचा निर्णय असाच झाला असता," असेही जोशींनी लिहिले आहे. परंतु माई मात्र त्या पत्राचा वरचेवर उल्लेख करत. पतिपश्चात आपल्या आयुष्याची घडी त्यांनी पुन्हा एकदा बसवली; पण तरीही पतीमागे तब्बल बावीस वर्षे एकट्याने राहण्याची वेळ येईल अशी त्यांची अपेक्षा नसावी. "मला घेऊन जायचं देव विसरून गेला," त्या कधीकधी म्हणत.

२० ◼ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा