लावलेला कोणी शेतकरी आला तर मालक लगेच अदबीने त्याचं स्वागत करतो, त्याला काय हवं-नको ते विचारतो."
'तंबाखूला भाव मिळो वा न मिळो, निदान शेतकऱ्याला तरी ह्या आंदोलनामुळे भाव मिळायला लागला' ही एक सार्वत्रिक प्रतिक्रिया होती. शेतकऱ्यांचा आत्मसन्मान जागवणे हे ह्या आंदोलनाचे एक महत्त्वाचे फलित होते.
आंतरराष्ट्रीय पातळीवर ऊस व कांदा आंदोलनापेक्षा या आंदोलनाला अधिक प्रसिद्धी मिळाली होती. बीबीसीचा उल्लेख मागे केलेलाच आहे. शरद जोशी यांनी नंतर निपाणीत पोलिसांनी केलेल्या अत्याचाराची माहिती देणारे एक पत्र आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस संघटनेलादेखील लिहिले होते.
त्या मानाने भारतीय वृत्तपत्रांनी मात्र ह्या अभूतपूर्व आंदोलनाची फारशी दखल घेतली नाही; मुंबईच्या झुंजार पत्रकार ओल्गा टेलिस ह्या एक सम्माननीय अपवाद. त्यांनी निपाणीला येऊन मुक्कामच केला होता व आंदोलनाविषयी लिहिलेही.
शरद जोशींचा आत्मविश्वास ह्या आंदोलनानंतर बराच वाढला. कांदा व ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्याप्रमाणे तंबाखू पिकवणारा शेतकरीदेखील पिढ्यानपिढ्यांची लाचारी दूर करून अन्यायाविरुद्ध उभा राहू शकतो, पोलिसांना न घाबरता आंदोलन करू शकतो हे आता सिद्ध झाले होते. तेवीस दिवस आंदोलनाची तीव्रता कायम ठेवणे सोपे नव्हते.
शिवाय या खेपेला महाराष्ट्राच्या सीमेबाहेर प्रथमच त्यांनी आंदोलन केले होते. चाकण व नाशिक ह्यांच्यापुढची ही पायरी होती. आंदोलनाने घेतलेली ही एक मोठीच झेप होती.
१८८ - अंगारवाटा... शोध शरद जोशींचा