पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणखी सात दिवस हिंडलगा येथील तुरुंगात डांबण्यात आले. शेवटी २५ एप्रिल रोजी शरद जोशींची व इतर नेत्यांची सुटका झाली.
 या आंदोलनाचे फलित म्हणजे २० एप्रिल १९८१ रोजी कर्नाटक शासनाने तंबाखूच्या खरेदी-विक्रीसाठी एक सहकारी संस्था स्थापन करायची घोषणा केली. तंबाखू व्यापाऱ्यांचे महत्त्व त्यामुळे अगदी नाहीसे झाले असे म्हणता येणार नाही, पण शेतकऱ्यांच्या जीवनावरची त्यांची घट्ट व जाचक अशी पकड त्यामुळे थोडीफार सैल झाली.
 यानंतरचा एक प्रसंग नोंदवण्याजोगा आहे. १ मे हा विजयदिन म्हणून साजरा करायचे सर्व स्थानिक शेतकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी ठरवले. शरद जोशींची उपस्थिती साहजिकच अपरिहार्य होती, पण इथेच शासनाने खोडा घातला; शरद जोशींनी तालुक्यात येण्यावरच सरकारने बंदी घातली. विजयसभा घ्यायची तरी कुठे, असा आता प्रश्न उभा राहिला. बराच खल केल्यावर त्यावर एक तोडगा काढला गेला. निपाणीच्या अर्जुन नगर भागात एक कॉलेज होते व ते नेमके महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर होते. कॉलेजची इमारत महाराष्ट्रात तर कंपाउंडची भिंत कर्नाटकात! त्याच जागी एका शेतात मग ही विजयसभा झाली! कर्नाटकच्या हद्दीत प्रचंड पोलीस बंदोबस्त होता, पण शरद जोशी भाषण करत होते ते व्यासपीठ महाराष्ट्रात असल्याने कर्नाटक पोलीस त्यांना अटक करू शकले नाहीत! शरद जोशी महाराष्ट्रात तर श्रोते कर्नाटकात! प्रसंग म्हटले तर गमतीदार आणि म्हटले तर राज्या-राज्यांतील सीमा किती तकलादू आहेत हेही दाखवणारा.
 केवळ शेतकरी संघटनेच्याच नव्हे तर एकूणच भारतातील सामाजिक चळवळीच्या इतिहासात निपाणीच्या ह्या तंबाखू आंदोलनाचे खूप महत्त्व आहे. तेवीस दिवस शेतकरी शांततापूर्वक एका जागी बसून सत्याग्रह करू शकतात ही घटनाच अगदी आगळी होती.
 या आंदोलनातील दोन हजाराहून अधिक तंबाखू कामगार स्त्रियांचा रोजचा सहभाग खूप उल्लेखनीय होता. त्यांची पूर्वीची अगतिक आणि लाचार अशी अवस्था ज्यांनी पहिली होती, त्यांच्या दृष्टीने तर ह्या स्त्रियांनी असे धीटपणे पुढे येणे, आंदोलनात सहभागी होणे हा एक चमत्कारच होता.
 शेतकरी आणि कामगार इथे एकत्र लढा देत होते हेही एक अनोखेपण होते.
  शेतकरी आंदोलन हे बड्या बागाइतदारांचे आंदोलन नक्की नाही हेही इथे पुन्हा एकदा अधोरेखित झाले होते; कारण ९५ टक्के तंबाखू शेतकरी हे अल्पभूधारकच होते.
 प्रांतवाद, सीमावाद हे सगळे राजकीय नेत्यांनी स्वतःच्या प्रतिमानिर्मितिसाठी निर्माण केलेले क्षुद्रवाद आहेत; खरा प्रश्न हा आर्थिक आहे, शेतकऱ्याच्या व म्हणून एकूण देशाच्या दारिद्र्याचा आहे; सामान्य माणसाच्या मनात हे भेदभाव नसतात, ते हेतुतः निर्माण केले जातात हे शरद जोशींचे मत इथे पुन्हा एकदा सिद्ध झाले होते.
 एक शेतकरी सांगत होते, “पूर्वी आम्ही निपाणीला एखाद्या हॉटेलात किंवा सलूनमध्ये किंवा दुकानात गेलो, तर मालक आमच्याकडे ढुंकूनसुद्धा बघत नसे. पण आता लाल बिल्ला


धुमसता तंबाखू - १८७