पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गुरुवार, दोन एप्रिलला आंदोलन नगरीपासून निपाणी शहरापर्यंत, तिथून शहराची मुख्य बाजारपेठ व इतर महत्त्वाचा भाग, आणि तिथून मग परत आंदोलन नगरीत असा एक भव्य मोर्चा शेतकऱ्यांनी काढला. मोर्यात सुमारे ४०,००० शेतकरी हजर होते; पण सगळा मोर्चा इतका शिस्तबद्ध होता, की आपल्या लाठ्या हलवत रस्त्याच्या कडेला उभे राहण्यापलीकडे पोलिसांना काहीच काम नव्हते. एरव्ही मोर्चा म्हणजे काही ना काही गडबड व्हायचीच, पण हा मोर्चा इतका मोठा असूनही इतका सुनियोजित व शांत कसा, ह्याचे पोलिसांनाच नव्हे तर सगळ्या निपाणी गावालाच खूप आश्चर्य वाटले होते. ज्याच्यात्याच्या तोंडी त्यादिवशी तोच एक विषय होता.
 वयोवृद्ध गोपीनाथ धारिया ऊर्फ भाई हेही ह्या मोऱ्यांत आवर्जून सामील झाले होते. चालताना एकदा ठेच लागून ते पडले. हातापायाला जबर मार लागला, डोके दगडावर आपटून रक्त येऊ लागले. 'भाई, तुम्ही एखाद्या खुर्चीत बाजूला बसून राहिलात तरी चालेल, असे सांगत अनेक नेत्यांनी त्यांना थोडा आराम घ्यायचा सल्ला दिला. पण भाईंचा उत्साह कायम होता. तशाही परिस्थितीत ते शेवटपर्यंत त्या सुमारे आठ किलोमीटरच्या मोर्ध्यात कडक उन्हाची पर्वा न करता चालत होते. खरेतर ते एक बडे बागाइतदार होते, प्रतिष्ठित कुटुंबातले होते; पण एखाद्या सामान्य कार्यकर्त्याप्रमाणेच वावरत होते. स्वतःसाठी कुठलीही खास सवलत त्यांना नको होती.
 पुण्याच्या माणूस साप्ताहिकाचे संपादक श्रीभाऊ माजगावकर त्या दिवशी निपाणीत हजर झाले. नाशिक आंदोलनाच्या वेळीही ते हजर होते. त्यांच्याच आग्रहावरून परुळकरांनी 'योद्धा शेतकरी' व पुढे 'रक्तसूट' या लेखमाला लिहिल्या. मोर्चा पाहून ते अतिशय प्रभावित झाले होते. म्हणाले, "हा विराट मोर्चा म्हणजे सत्याग्रही शेतकऱ्यांचा अजस्त्र आणि पवित्र असा जणू गंगौघ. नुसत्या दर्शनानेदेखील पावन व्हावे अशी ही आगळी गंगा!"
 योगायोग म्हणजे 'सोबत'कार ग. वा. बेहेरे हेही त्या दिवशी निपाणीला येऊन आंदोलनाची पाहणी करून गेले.

 शुक्रवार, तीन एप्रिलला निपाणी गावात मूठभर व्यापारी आणि त्यांच्या चेल्यांनी एक मोर्चा काढला होता. आदल्या दिवशीच्या शेतकऱ्यांच्या मोर्ध्याला उत्तर म्हणून. निपाणीतील गावकऱ्यांचा ह्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा नाहीए हे दाखवणे हा त्यामागचा उद्देश. मोर्ध्यात तशी दीड-दोनशेच माणसे होती, पण त्यांनी जाता जाता सुभाष जोशी यांच्या गावातील घरावर दगडफेक केली, घरासमोर उभ्या असलेल्या त्यांच्या मोटार सायकलची व रस्त्यात उभ्या केलेल्या इतरही अनेक मोटार सायकलींची नासधूस केली. शेतकरीनेत्यांच्याविरुद्ध नालस्ती करणाऱ्या घोषणा दिल्या. अनेक घरांवर दगडफेक केली. गोपीनाथभाईंच्या घराच्या तर सगळ्याच खिडक्या दगडफेक करून फोडल्या गेल्या. नंतर गावात मोर्ध्याचे रूपांतर एका सभेत झाले. सभेत मात्र काही स्थानिक नेत्यांनी अनपेक्षितपणे शेतकरी आंदोलनाला आपला

धुमसता तंबाखू - १७९