पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भागवायला हजर झाले होते. निपाणीतील छोट्या छोट्या दुकानदारांनीही आपापले स्टॉल्स तिथे उभारले होते. प्रत्येक गोष्ट स्वस्तात उपलब्ध होती. निपाणीत एक कप चहाला पंचवीस पैसे पडत, तर इथे वीस पैसे. कलिंगडाची फोड निपाणीत तीस पैसे, तर इथे दहा पैसे. सगळे स्टॉल्स स्वच्छ होते, मालातही भेसळ अजिबात नव्हती. चोरीमारीचा तर एकही प्रकार संपूर्ण आंदोलनकाळात एकदाही घडला नाही. किसान मेळावे हा प्रकार आता देशात नवीन राहिलेला नाही. खूपदा राजकीय पक्ष आपल्या शक्तिप्रदर्शनासाठी असे मेळावे भरवत असतात. त्यासाठी पैसे देऊन ट्रक भरभरून शेतकरी आणले जातात. दिल्ली हे तर अशा किसान मेळाव्यांचे प्रथम पसंतीचे शहर असते. शेतकरी आणि खाद्यपदार्थ विकणारे स्थानिक फेरीवाले यांच्यात अशा सर्वच किसान मेळाव्यांत नेहमीच हाणामाऱ्या होत असतात. किसान मेळावा कोणत्याही पक्षाचा असो, स्टॉल्स हमखास लुटले जातात. रेल्वे प्लॅटफॉर्मवरच्या विक्रेत्यांना तर हा अनुभव नेहमीच येतो. म्हणूनच किसान मेळावा म्हटले की फेरीवाले तिथे फिरकतच नाहीत. पण इथला अनुभव मात्र अगदी वेगळा होता. इथे जवळ जवळ दीडशे स्टॉल्स होते व सर्व उत्तम चालले होते.
 १८ मार्चला सांघिक उपोषणाच्या आदल्या रात्री सगळे फेरीवाले म्हणाले, "उद्या तुमचे उपोषण असल्याने आमचे काहीच पदार्थ विकले जाणार नाहीत. तेव्हा आमचे स्टॉल्स आम्ही उद्या बंद ठेवतो व मालही इथेच ठेवून आम्ही निपाणीला जातो. कारण तो निपाणीला परत नेणे ह्या गर्दीत अशक्य आहे." त्यावर आंदोलक म्हणाले, “पण मालाची जबाबदारी आम्ही कशी घेणार?" ह्यावर फेरीवाल्यांचे म्हणणे होते, "आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे." आणि त्याप्रमाणे सगळे स्टॉल्स १८ मार्चला बंद होते; त्यांच्यातील माल तिथेच होता, फेरीवाले मात्र सगळे तसेच ठेवून एक दिवसासाठी निपाणीला गेले होते.
 आश्चर्य म्हणजे दसऱ्या दिवशी फेरीवाले परत आले. तेव्हा एकाही फेरीवाल्याचा स्टॉल लुटला गेला नव्हता, कोणाच्याही मालाला शेतकऱ्यांनी हातसुद्धा लावला नव्हता! आंदोलन नगरीत हे जे घडले, ते कुठल्याही गावात घडणे अशक्य होते. परुळकरांना एक फेरीवाला म्हणाला,
  “यल्लमाच्या जत्रेत आम्ही जेव्हा दुकान उघडतो, तेव्हा देवीच्या दर्शनाला आलेली अनेक माणसे आमचे पैसे बुडवतात, माल पळवतात. पण इथे तंबाखूदेवीच्या यात्रेला जमलेल्या ह्या शेतकऱ्यांनी आमची एक पैसुद्धा बुडवली नाही."
 चाकणच्या कांदा आंदोलनाप्रमाणे इथेही जोशींनी आंदोलकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली होती. निपाणीच्या डॉक्टरांनी एक खास तंबू उभारला होता व तिथे ते औषधोपचार करत असत. भोज ह्या गावचे तरुण सरपंच डॉ. अद्गौंडा पाटील आपला गावात जोरात चालणारा दवाखाना सोडून इथे १४ मार्चपासून संपूर्ण वेळ हजर होते. त्याच गावचे डॉ. माने व डॉ. सदलगे यांचीही त्यांना मदत होत होती. डॉ. ध्रुव मंकड हा मुंबईतील एक उमदा तरुण डॉक्टर संपूर्ण आंदोलनकाळात तिथेच तळ ठोकून होता. दुर्गम व कुठलाच डॉक्टर नसलेल्या खेड्यांत राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही विनामूल्य वैद्यकसेवा म्हणजे एक पर्वणीच होती.

१७८  अंगारवाटा... शोध शरद जोशींचा