पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अशा स्थितीत आंदोलनकर्त्यांचा उत्साह कायम टिकवणे हे नेत्यांपुढचे एक मोठे आव्हान होते. त्यासाठी रोज काही ना काही उपक्रम राबवले जात. उदाहरणार्थ, १८ मार्च रोजी आंदोलन नगरीत ३००० शेतकऱ्यांनी एक दिवसाचे सांघिक उपोषण केले. इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेले उपोषण ह्यापूर्वी कधी कोणी बघितले नसेल. शेतकऱ्यांचा आत्मविश्वास खूप वाढवणारी ही घटना होती.
 त्याशिवाय नेत्यांची, मुख्यतः शरद जोशींची, रोज संध्याकाळी होणारी भाषणे हेही एक मोठे आकर्षण असे. एका ट्रेलरवर पाण्याची रिकामी टाकी ठेवून स्टेज बनवले जाई. त्या टाकीवर उभे राहून, हातात माइक घेऊन जोशी भाषण करत. निपाणीतील एक व्यापारी म्हणाले होते, “या जोश्यांचे भाषण रोज ऐकावेसे वाटते. कधी कंटाळा म्हणून येत नाही." रोज संध्याकाळी पाचच्या सुमारास ते आपले दुकान बंद करत व स्वतःतर भाषणाला येऊन बसतच, पण शिवाय आपल्या सर्व नोकरांनाही भाषण ऐकायला पाठवत. निपाणीतील अनेक दुकानदारांच्या बाबतीत हे खरे होते.
 बहुसंख्य आंदोलक हे कानडीभाषक होते, पण अल्पसंख्य असलेल्या मराठी शेतकऱ्यांबरोबर ते अतिशय खेळीमेळीने वागत होते. आंदोलकांमध्ये स्त्रियांचे प्रमाणही भरपूर होते. रात्री जेवणानंतर तर एखाद्या जत्रेसारखे आनंदाचे वातावरण तिथे तयार होई. सुरुवातीला एखादा वक्ता आज संध्याकाळी भाषणांत कोण काय बोलले ते थोडक्यात कानडीत सांगे. त्यानंतर सगळे आंदोलक रात्री उशिरापर्यंत चांदण्यांच्या उजेडात तालासुरात भजने म्हणत. गौळणी व भारुडेही म्हणत. आपापली वाद्ये त्यांच्याकडे होती. अशी भजने म्हणण्याची परंपरा उत्तर कर्नाटकात पूर्वापार चालत आलेली आहे. अर्थात मराठी भजनेही होत. कानडी शेतकरीदेखील उत्साहाने मराठी भजने म्हणत व मराठी शेतकरीही तितक्याच उत्साहाने कानडी भजने म्हणत. भाषेची अडचण जराही जाणवत नसे. सर्व शेतकऱ्यांच्या छातीवरील बिल्ले, तसेच राहुट्यांवरील फलक हे मराठीतच होते व शरद जोशींची आंदोलन नगरीत रोज संध्याकाळी होणारी भाषणेही मराठीतच होत होती. पण त्याला कोणाही कानडी बोलणाऱ्याचा विरोध नव्हता.
 आपल्या एका जाहीर भाषणात जोशी म्हणाले, "आमच्या शेतीमालाला योग्य भाव द्यायला जर गुंड्र राव तयार असतील, तर अख्खा महाराष्ट्र कर्नाटकात घालायला शेतकऱ्यांच्या वतीने मी तयार आहे आणि तसा भाव जर अंतुले देणार असतील, तर अख्खा कर्नाटक महाराष्ट्रात घालायलाही मी तयार आहे." हे उद्गार त्यांनी निपाणीतल्याच नव्हे, तर हसन येथील भाषणातही काढले होते व सर्व उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांचे टाळ्यांच्या गजरात हार्दिक स्वागत केले होते. राजकारण्यांनी ज्याचे वर्षानुवर्षे इतके भांडवल केले होते, तो महाराष्ट्रकर्नाटक सीमावाद किंवा मराठी-कन्नड भाषावाद ह्यांचा ह्या आंदोलनात मागमूसही नव्हता.
 आंदोलननगरीत एक सामुदायिक उपाहारगृह चालवले जात होते व नाममात्र किमतीत तिथे खाद्यपदार्थ उपलब्ध होते. त्याशिवाय निपाणीतील असंख्य फेरीवालेही तिथे लोकांच्या गरजा

धुमसता तंबाखू - १७७