पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 इकडे 'रास्ता रोको'तील वातावरण तापत गेले होते. पुढल्या तीन-चार दिवसांत दिवसभरच्या आंदोलनात सामील होणाऱ्यांची संख्या चाळीस हजारांवर जाऊन पोचली. ह्या परिसराला 'आंदोलन नगरी' असेच सार्थ नाव पडले होते. काही शेतकरीतर अगदी वाजत गाजत आणि हत्तनि मिरवणूक काढून आंदोलन नगरीत येऊन पोचले होते.शेतकरी आंदोलनात हत्तींचा सहभाग हा प्रकार इथे प्रथमच बघायला मिळाला! महामार्गाचा दोन-तीन किलोमीटर लांबीचा पट्टा या जनसमुदायाने व्यापला होता.
 शरद जोशींचा रात्री झोपण्यापुरता मुक्काम तसा निपाणीत सुभाष जोशी यांच्या घरी होता, पण प्रत्यक्षात जवळजवळ सगळा दिवस ते ह्याच महामार्गावर स्वतःसाठी उभारलेल्या एक छोट्या झोपडीतच राहत होते; कधी कधी रात्रीही त्यांचा मुक्काम ह्या झोपडीतच असे. आपला नेता आपल्याबरोबरच राहतो आहे हे दृश्य शेतकऱ्यांच्या दृष्टीने अगदी अपरिचित व मनोधैर्य वाढवणारे होते. अधूनमधून सभांसाठी इतर गावांमध्ये जोशी जात, पण एरव्ही मात्र ते आंदोलनाचे पुढले सर्व तेवीस दिवस इथेच होते. रोज सकाळ-संध्याकाळ ते महामार्गावर फेऱ्या मारत. अधिकाधिक शेतकऱ्यांशी स्वतः बोलत. त्यांना धीर देत.
 सकाळी लौकर उठून आंदोलक प्रातर्विधी उरकत. त्यासाठी बऱ्यापैकी सोय महामार्गाच्या दुतर्फा केली होती. आंघोळीचीही सोय होती. शेतकऱ्यांनी स्वतःच अंतराअंतरावर आडोसे उभे करून शौचकप व न्हाणीघरांची तात्पुरती सोय केली होती. रस्त्यात कठेही खरकट्या पत्रावळ्यांचे ढीग, कागदाचे बोळे वा माणसांची विष्ठा दिसत नव्हती; कुठेही माशा घोंघावत नव्हत्या. ही स्वच्छता म्हणजे मोठे नवलच होते; एरव्ही आपापल्या घरांतही कदाचित ते गरीब शेतकरी इतकी स्वच्छता पाळू शकत नसतील.
 जरा उजाडले की आसपासच्या गावांतील लोकही आंदोलनात सामील होण्यासाठी तिथे दाखल होत. आपल्याबरोबर ते महामार्गावरील राहुट्यांत राहणाऱ्या अन्य आंदोलकांसाठी भाकऱ्या-चटणी-कांदा-पिठले वगैरे पदार्थ गाड्या भरभरून घेऊन येत. शिवाय पिंपेच्या पिंपे भरून आंबील आणली जाई. ज्वारी अथवा नाचणीच्या पिठात ठेचलेली लसूण घालून बनवलेले हे पेय ह्या भागात खूप लोकप्रिय. आंदोलननगरीत पाण्याचे काही नळही आले होते व काही ठिकाणी विजेची कनेक्शन्सदेखील मिळवली गेली होती; त्यामुळे काही ठिकाणी झाडांना ट्यूब लाइट्स लटकत होत्या.
 सुरुवातीला आंदोलकांना वाटले होते, की आपली एकजूट बघून दोन-तीन दिवसांत सरकार नरम येईल व आपल्या मागण्या मान्य करेल; तशाही त्या अगदी न्याय्य व साध्याच आहेत. पण प्रत्यक्षात सरकार इतके कोडगे बनले होते, की त्याच्याकडून काहीच हालचाल होत नव्हती. महात्मा गांधी सत्याग्रह हे अस्त्र प्रभावीपणे ब्रिटिश सरकारविरुद्ध वापरू शकले, कारण ते सरकार अधिक जनताभिमुख होते व जनतेतील असंतोषाची लगेच दखल घेण्याइतके संवेदनशील होते. पण इथले सरकार मुळातच जनताभिमुख व संवेदनशील नसल्याने सत्याग्रहाचे तेच हत्यार इथे मात्र अगदीच बोथट ठरत होते; किंबहुना गेंड्याच्या कातडीच्या सरकारवर त्या अस्त्राचा काहीच परिणाम होताना दिसत नव्हता.

१७६ . अंगारवाटा... शोध शरद जोशींचा