पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होती. ही आकडेवारी तशी बोलकी आहे.
 महाराष्ट्राचे तर सारे राजकारण त्यावेळी तरी साखरेभोवती व म्हणून उसाभोवती फिरत होते. देशभरातील उसाचे प्रभावक्षेत्रही खूप मोठे होते.
 उसातील आर्थिक उलाढाल कांद्यातील आर्थिक उलाढालीपेक्षा कित्येक पट अधिक होती.
 ह्या आंदोलनाचे पडसाद पंजाबपर्यंत कसे पोचले ते लिहिलेच आहे.
 ह्या आंदोलनातून नव्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची एक मोठी फौजच तयार झाली.
 आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सर्वसामान्य शेतकरी ह्या आंदोलनानंतर खूपच अधिक धीट झाला. आपण पोलिसांच्या लाठ्या खाऊ शकतो, तुरुंगात जाऊ शकतो आणि अंतिमतः आपल्या मागण्या मान्य करून घेऊ शकतो, हा आत्मविश्वास त्याच्या मनात आता जागा झाला. 'घाला आम्हाला तुरुंगात. तुमचे सगळे तुरुंगही त्यासाठी अपुरे पडतील. आमच्यानंतर आमची बायका-मुलेही तुरुंगात जायला तयार आहेत. एवढे करून नाही भागले, तर आमची शेतीची गुरेढोरेही आम्ही सत्याग्रहासाठी रस्त्यावर आणू' अशी भावना शेतकऱ्यांच्या बोलण्यात व्यक्त होत होती, त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. 'दम है कितना दामन में तेरे, देख लिया है, देखेंगे' असेच जणू आता तो शेतकरी सरकारच्या डोळ्याला डोळा भिडवून म्हणत होता.

 अर्थात, ऊस आंदोलन हे काही सर्वस्व नव्हे, आपला खरा लढा खूप लांबच्या पल्ल्याचा आहे, ही केवळ सुरुवात आहे, ह्याची शरद जोशींना एव्हाना स्पष्ट कल्पना आली होती.

उसाचे रणकंदन १६५