पहिल्या सकाळी आपल्या प्रास्ताविक भाषणात जोशींनी शेतकरी संघटनेचा पुढील अष्टसूत्री कार्यक्रम स्पष्ट केला :
- देशातील दारिद्र्य हे सर्वप्रथम ग्रामीण भागातील शेतकऱ्याचे दारिद्र्य आहे. शहरातील गरिबी हा केवळ ग्रामीण दारिद्र्याचा एक परिणाम आहे.
- शेतकऱ्याचे दारिद्र्य हे सर्वस्वी कोरडवाहू शेतकऱ्याचे दारिद्र्य आहे.
- कोरडवाहू शेतकऱ्याचे दारिद्र्य सतत वाढत आहे. १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यापासून त्याची परिस्थिती खूपच खालावली आहे.
- ह्या दारिद्र्याचे कारण हे, की शेतीमालाला नेहमीच अपुरा भाव मिळतो व शेतकऱ्याचा उत्पादनखर्चसुद्धा भरून निघत नाही.
- कोरडवाहू शेतीचा खर्च पावसाच्या अनिश्चिततेमळे फार वाढतो. उलटपक्षी हंगामी पावसावर काढलेली सर्व पिके एकदम बाजारात येतात आणि सुगीनंतर सर्व शेतीमालाचे भाव कोसळतात.
- या परिस्थितीचा फायदा घेऊन इंग्रजांनी देशाचे शोषण केले. 'कच्चा माल स्वस्तात स्वस्त, पक्का माल महागात महाग' हे त्यांचे वसाहतवादी सूत्र. स्वातंत्र्यानंतरच्या काळात राज्यकर्त्यांना हीच पद्धत चालू ठेवली. भारतावर इंडियाने अंमल बसवला.
- शेतीमालाचे विविधीकरण, त्याच्या साठवणाची व्यवस्था, शेतीमालावरच्या प्रक्रियेचे उद्योगधंदे, शेतीमालाच्या किमान भावाची हमी अशा कार्यक्रमांऐवजी शहरी नोकरशाहीचा लाभ करून देणारे कार्यक्रम सरकारने राबवले.
- दीन शेतकऱ्याची आज तथाकथित विधायक मार्गाने जाण्याची ताकद नाही. त्याला तेवढा अवसरही नाही. संघटित लढा हा एकच मार्ग आज त्याला उघडा आहे.
जोशीनंतर सुप्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ वि. मा. कुलकर्णी बोलले. पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागात ते 'विकास पत्रकारिता' हा विषय शिकवत. मूळचे ते चाकण परिसरातील कडूस ह्या गावचे. त्यांनी पायवाट नावाचे एक साप्ताहिक सुरू केले होते व अतिशय निष्ठेने जवळजवळ एकहाती ते चालवले होते. ग्रामीण भागाकडे कायम होणारे दुर्लक्ष व ग्रामीण अर्थव्यवस्थेची हेळसांड ह्यावर त्यांचा भर होता.
डॉ. मो. वि. भाटवडेकर हे आंतरराष्टीय कीर्तीचे अर्थतज्ज्ञ स्वतःहून अगत्याने शिबिराला हजर राहिले होते. कुलकर्णी यांच्यानंतर ते बोलले. 'अर्थविकास आणि जागृती' हा विषय त्यांनी घेतला होता. उत्पादन वाढले म्हणजे शेतकऱ्याची स्थिती सुधारते का, ग्रामीण भारताची हेळसांड हेतूतः झाली की अजाणतेपणी आणि विकास आधी की जागृती आधी ह्या तीन प्रश्नांचा त्यांनी ऊहापोह केला. हे तिन्ही मुद्दे तसे नावीन्यपूर्ण होते व त्यांवर भाषणानंतर बरीच चर्चा रंगली.
दुपारी शेतकरी संघटनेने चालवलेल्या सध्याच्या लढ्याविषयी व संघटना उभारण्याविषयी चर्चा झाली. प्रत्यक्ष व्यवहारातील बाबींवर त्यात भर होता. रात्री जेवण झाल्यानंतर राष्ट्रीय