पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आता कुठलेच वाहन आरपार जाणे शक्य नव्हते. एव्हाना आंदोलकांची संख्या चारपाच हजाराच्यावर गेली होती. गंमत म्हणजे अडकलेल्या वाहनांमध्ये एक वाहन होते मुंबईचे झुंजार कामगारनेते व आमदार डॉ. दत्ता सामंत यांचे. एका प्रचारसभेसाठी त्यांना मंचरला जायचे होते, पण त्यांना पुढे जाता येईना. चालत चालत ते आंदोलकांपाशी गेले व तिथला माइक घेऊन त्यांनी "कामगारवर्ग लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील" असे ठणकावून सांगितले. त्यानंतर जोशींच्या सांगण्यावरून त्यांच्या वाहनाला तेवढी वाट मोकळी करून दिली गेली. दोन दिवसांनंतर होणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार घालायचे सभेत ठरले. बघता बघता संध्याकाळचे पाच वाजले.

 महामार्ग बंद पडल्याने वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली होती. दरम्यान बराच मोठा फौजफाटा घेऊन पोलीस घटनास्थळी हजर झाले. आंदोलकांना त्यांनी चारी बाजूंनी वेढले. बाबूलाल परदेशी त्यावेळी भाषण करत होते. एक इन्स्पेक्टर पुढे झाला व त्याने त्यांच्या हातातला माइक हिसकावून घेतला. पण तेवढ्यात जोशींनी तो ओढून आपल्या हातात घेतला व ते बोलायचा प्रयत्न करू लागले. समोर जमलेल्या शेतकऱ्यांना उद्देशून त्यांना काहीतरी आवाहन करायचे होते. पण ते काही बोलायच्या आतच त्या इन्स्पेक्टरने त्यांच्याही हातातला माइक हिसकावून घेतला व सर्व आंदोलकांना अटक करण्यात येत आहे' असे जाहीर केले. 'आम्ही इथून हलणारच नाही, तम्ही काय वाटेल ते करा,' असे म्हणत जोशींनी व इतर कार्यकर्त्यांनी रस्त्यातच बसकण मारली. ते ऐकेनात म्हणून शेवटी एकेक करत त्यांना चार-चार पोलिसांनी उचलले व एका पोलीस गाडीत कोंबले. आंदोलकांना पकडण्यासाठी पोलिसांनी पाच एसटी बसेस व दोन मोठ्या पोलीस गाड्या तयार ठेवल्या होत्या. त्यात सगळ्यांना कोंबण्यात आले व गाड्या तिथून निघाल्या. पोलिसांनी जोशींना व त्यांच्याबरोबर एकूण ३१६ आंदोलनकर्त्यांना अटक केली.

 रात्री दहा वाजता चाकणमध्येच त्यांना मॅजिस्ट्रेटसमोर उभे केले गेले. आधी असे वाटले होते, की त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून दुसऱ्या दिवशी सोडून दिले जाईल. पण ह्यावेळी शासनाने ताठर भूमिका घेतली होती. १७ फेब्रुवारीपासूनच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. सगळ्यांना १० दिवसांचा रिमांड दिला गेला. जोशींना इतर सात कार्यकर्त्यांसह औरंगाबाद येथील तुरुंगात डांबण्यात आले. इतरांची रवानगी वेगवेगळ्या तुरुंगांत केली गेली. त्या कारावासातील अनुभवावर आधारित 'सजा-ए-औरंगाबाद' नावाची एक रसाळ लेखमाला वारकरीमध्ये (१२ जुलै ते १३ सप्टेंबर १९८०) बाबूलाल परदेशी यांनी लिहिली होती.

 आंदोलकांना ह्यावेळी पोलिसांचा चांगला अनुभव आला. बरेचसे पोलीस म्हणजे स्वतः शेतकऱ्यांची मुले होती. शेतकऱ्यांच्या मागण्या अगदी न्याय्य आहेत, याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे कदाचित त्यांच्या मनात आंदोलनकर्त्याविषयी काहीशी सहानुभूती होती. सर्वांत चांगला अनुभव आला तो औरंगाबाद जेलच्या प्रमुख जेलरचा. त्यांनी सुरुवातीलाच सगळ्यांना सांगितले,

चाकणचा कांदेबाजार : पहिली ठिणगी१३९