कारण दाखवून आलेला कांदा परत पाठवत होते.
शनिवार, २४ मेची दुपार. मोठ्या संख्येने कांद्याचे ढीग लिलावासाठी बाजारसमितीच्या आवारात पडून होते पण नाफेडतर्फे त्यातले फक्त दहा टक्के ढीग खरेदी केले गेले; बाकीचे 'रिजेक्ट' म्हणून तसेच पाडून ठेवले गेले. त्या 'रिजेक्ट' ढिगांचे काय करायचे ह्या काळजीने शेतकरी हवालदिल झाले होते. दिवसभरात जोशी यांनी नाफेडच्या अधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा केली, पुण्याला जाऊन ते मुद्दाम कलेक्टरनाही भेटून आले. 'उद्या रविवार असूनही खरेदी चालू ठेवू व उद्या व्यवस्थित व्यवहार होईल' असे आश्वासन त्यांनी मिळवले.
त्यानुसार रविवारी पुन्हा खरेदी चालू झाली. पण ढीग नाकारण्याचे प्रमाण तेच कायम होते. उदाहरणार्थ, बाजीराव शिंदे या दलालाच्या गाळ्यासमोर कांद्याचे ४२ ढीग होते, पण त्यांपैकी नाफेडने फक्त एक ढीग खरेदी केला. इतर दलालांच्या गाळ्यांसमोरही साधारण हेच प्रमाण होते. शंकरराव वाघ, बाबूलाल परदेशी व जोशी सतत बाजारपेठेत फिरत होते. शेतकरी त्यांच्यापाशी मोठ्या प्रमाणावर तक्रारी घेऊन येऊ लागले. नाकारलेले ढीग का नाकारले गेले याची माहिती व्यवस्थित भरून घेण्यासाठी शेतकरी संघटनेने काही फॉर्म छापून घेतले होते. त्यात ती माहिती भरली जात होती. एकूण २०० अर्ज छापून घेतले होते व ते सर्व भरले गेले. शेवटी कोऱ्या कागदावर ही माहिती भरून घ्यायला संघटनेने सुरुवात केली. तसे कोऱ्या कागदावरचेही ४५० अर्ज भरले गेले, पण तरी तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांची गर्दी एवढी होती, की त्यांचे आता काय करायचे हा प्रश्नच होता.
लांबलांबचे शेतकरी इथली कांद्याची बाजारपेठ मोठी, म्हणून मुद्दाम आपला माल इथे घेऊन येत. असेच अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील काही शेतकरी २५ दिवसांपूर्वी आले होते, पण अजूनही त्यांचा कांदा विकत घेतला गेला नव्हता. ते शेतकरीही रस्त्यावरच मुक्काम ठेवून होते. एव्हाना त्यांचा धीर पार खचला होता. बाजारसमितीत येऊन ते अक्षरशः रडायलाच लागले. ते म्हणत होते, "आमच्या कांद्याकडे कोणीच ढुंकून पाहत नाही. तीन आठवडे झाले आम्ही इथे बसून आहोत. आम्हाला कोणीच वाली नाही. काहीही करा पण आता आमचा निर्णय लावा."
पण नाफेडच्या अधिकाऱ्यांवर त्याचा काहीही परिणाम होत नव्हता. 'उद्यापासून व्यवस्थित व्यवहार होईल' हे त्यांचे आश्वासन फक्त तोंडदेखलेच होते. एक ढीग असा होता, की त्याची खरेदी ६० रुपये क्विटल दराने व्हायला हवी होती. पण तो ढीगही नाफेडच्या अधिकाऱ्यांनी नामंजूर केला. जोशी स्वतः त्यावेळी ढिगाजवळ उभे होते व त्यांनी स्वतः तपासून तो ढीग उत्तम असल्याचे सांगितले. पण अधिकारी ऐकेनात. ही म्हणजे जणू उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी होती. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी संघटनेच्या बाजूने व नाफेडच्या विरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली व लिलाव बंद पाडला. शेतकरी तसेच पुणे-नाशिक महामार्गावर आले, मोठ्या प्रमाणावर रस्त्यालगतचे दगड गोळा करून त्यांनी ते रस्त्यात ठेवले व त्यांनी स्वतःही तिथेच बसकण मारली. पुन्हा एकदा रास्ता रोको सुरू झाले.