"हा एवढा सगळा पैसा शेतीत गुंतवण्यामागे आणखी एक विचार होता – तो म्हणजे शेतीतून बाहेर पडायचा आपल्याला कधीच मोह होऊ नये!"
हे सारे करत असताना भोवतालच्या इतर स्थानिक मंडळींशी जोशींचे संबंध कसे होते? सुरुवातीला ते अर्थातच अगदी परके होते, पण जसजसे दिवस जात होते, तसतसे त्यांचे स्थानिक परिचितांचे वर्तुळ वाढू लागले.
७ ऑगस्ट २०१५ रोजी सुरेशचंद्र म्हात्रे ह्यांच्या सौजन्याने चाकण येथे एक सुखद योग घडून आला. म्हाळुंगे येथील एक हॉटेलमालक श्याम पवार, चाकणमधील एक जुने डॉक्टर अविनाश अरगडे, मांडव कॉट्रॅक्टर गोपालशेठ मारुती जगनाडे (संत तुकारामांच्या अभंगांचे लेखनिक म्हणून ज्यांनी एकेकाळी काम केले होते त्या संताजी महाराजांचे हे वंशज), राष्ट्र सेवा दलाचे शाखाप्रमुख रामराव मिंडे, ऑइल इंजिन दुरुस्ती करणारे मधुकर रघुनाथ शेटे, आप्पासाहेब ऊर्फ प्रल्हाद रंगनाथ देशमुख, मामा शिंदे वगैरे जोशींच्या त्यावेळच्या काही निवडक सहकाऱ्यांबरोबर त्यादिवशी प्रस्तुत लेखकाला मनसोक्त गप्पा मारता आल्या आणि त्यावेळचे जोशींच्या सहकारी वर्तुळाचे चित्र डोळ्यापुढे आपोआपच उभे राहत गेले.
आप्पासाहेब ऊर्फ प्रल्हाद रंगनाथ देशमुख आणि बाबुभाई शहा यांच्यापासून बहुधा ह्या स्थानिक वर्तुळाची सुरुवात झाली. ह्या दोघांचीही त्याकाळी चाकण परिसरात सायकल दुरुस्त करायची दुकाने होती. ग्रामीण भागात त्यावेळी सायकल हेच वाहतुकीचे प्रमुख साधन होते. दोघांच्याही व्यावसायिक जीवनाची ती सुरुवात होती. अप्पा देशमुखांनी पुढे डिझेल पंपाची निर्मिती व दुरुस्ती करायचे केंद्र काढले. ते स्वतः कुशल फिटर होते व देशमुख फिटर म्हणूनच त्यांना सगळे हाक मारत. जोशींच्या शेतातील विहिरीवर बसवलेला पहिला डिझेल पंप त्यांनी देशमुखांकडूनच खरेदी केला होता. पुढे फॅब्रिकेशनचा व्यवसायदेखील ते उत्तम करू लागले. शेतातील गोबर गॅस प्लांट, शेड हे सारेही त्यांनीच उभारून दिले होते. बाबुभाईंनीतर पुढे आणखी व्यावसायिक प्रगती केली. एक पेट्रोल पंप काढला आणि मोटर गाड्यांचे सर्व्हिसिंग सेंटरही काढले. शेतीमालाच्या साठवणुकीसाठी त्यांनी एक हिमराज कोल्ड स्टोरेजदेखील काढले. पुढे जोशींनी बटाट्याचे पीक काढायला सुरुवात केली तेव्हा आपल्या शेतातले बटाटे विक्री होईस्तोवर ते हिमराज कोल्ड स्टोरेजमध्येच ठेवत असत.
अशाप्रकारेच पुढे एकेक करत उपरोक्त सगळ्या स्थानिक मंडळींशी जोशींचे संबंध जडले. सुरुवातीला ते व्यावसायिक संबंध होते, पण पुढे त्याचे स्नेहात रूपांतर झाले. ही मंडळी नंतर त्यांच्या शेतकरी आंदोलनातही यथाशक्ति सामील झाली. जगनाडे यांनी पंढरपूर येथील मेळाव्याचा तसेच परभणी अधिवेशनाच्या वेळचा सगळा मांडव अत्यल्प खर्चात उभारून दिला होता. श्याम पवार, डॉ. अविनाश अरगडे वगैरे सगळेही आंदोलनात जमेल तसा सहयोग देत राहिले. त्र्याण्णव वर्षांचे मधुकर शेटे प्रस्तुत लेखकाला सांगत होते,
"आम्ही तशी आपापला छोटा व्यवसाय करणारी माणसं. चळवळ वगैरे आमचं क्षेत्र कधीच नव्हतं. पण जोशीसाहेबांचा प्रभाव आमच्यावर असा काही पडला, की आम्ही