पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१००

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कोणी म्हणतात, इतका इतका मूग आला, इतका कांदा आला. म्हणजे सगळ्यांचंच एकूण चांगलं चाललेलं दिसतंय. मग मला हे समजत नाही की मी इतका शिकलेला असूनही आणि सगळा वेळ ह्या शेतीतच राबत असूनही मला का प्रत्येक वेळी तोटा येतोय? माझं नेमकं कुठे चुकतंय?"

 गप्पा संपल्यावर त्यांना बाजूला घेऊन एक म्हातारा सांगू लागला, “साहेब, हे सगळे लोक थापा मारताहेत. हे जर असं काही सगळ्यांसमोर बोलले नाहीत, तर ह्यांच्या घरच्या मुलींची लग्नं होणार कशी? तुमचा अनुभव हाच खरा अनुभव आहे. आपण सगळेच शेतकरी तोट्यातच आहोत."

 शेतकऱ्यांची आत्मवंचना किती भयाण आहे हे त्यादिवशी जोशींच्या लक्षात आले. सरकार शेतकऱ्याकडून लेव्हीची ज्वारी फक्त सत्तर पैसे किलो दराने खरेदी करत असतानाही, हे शेतकरी दीड रुपये किलो दराने खुल्या बाजारातन ज्वारी खरेदी करतात आणि ती बैलगाडीवर लादून सरकारी गोदामात आपली अपुरी भरलेली लेव्ही पूर्ण करायला जातात तेव्हा मात्र बँडबाजा लावून, वाजतगाजत जातात, ह्या मुर्खपणाचे कोडे त्यांना उलगडले. मुळात फारच थोडे शेतकरी आपला नेमका उत्पादनखर्च काढतात, त्यात काय काय पकडायचे ते खूपदा त्यांच्या लक्षातही येत नाही हा एक भाग होताच; पण शिवाय, आपली इभ्रत कायम राहावी म्हणून इतरांपुढे करायचे नाटकही त्यात होते.

 शेतीमालावर प्रक्रिया केल्याशिवाय त्याची बाजारातील किंमत वाढणार नाही हे त्यांच्यातील अर्थतज्ज्ञाला सहज समजण्यासारखे होते. त्या दृष्टीनेही जोशींनी वेगवेगळे प्रयोग करून बघितले. चाकण परिसरात पूर्वी कोणीतरी बटाट्याचे वेफर्स करायचा छोटा कारखाना सुरू केला होता, पण लौकरच तो बंद पडला होता. त्याचे आपण पुनरुज्जीवन करू शकू का, किंवा तसाच एखादा कारखाना आपण उत्तमप्रकारे नव्याने उभारू शकू का, ह्याचा त्यांनी खोलात जाऊन विचार केला होता. बरीच आकडेमोड केली होती. त्यासाठी त्यांनी एकदा स्वित्झर्लंडला भेटही दिली होती. शेंगदाण्यावर आधारित प्रक्रियाउद्योग सुरू करण्याचा आणि चांगल्या दर्थ्यांचे शेंगदाणे पिकवून ते परदेशी निर्यात करायचा प्रयत्नही त्यांनी केला होता. कारण त्या भागात भुईमुगाचे पीक भरपूर यायचे. ह्या दोन्ही पुढाकारांबद्दल मागील प्रकरणात लिहिलेच आहे.

 अशा वेगवेगळ्या प्रयोगांसाठी जोशींनी स्वतःची सारी पुंजी पणाला लावली होती. युपीयुमधील नोकरी सोडून ते भारतात परतले तेव्हा त्यांना पाच-सहा लाख रुपये फंड, ग्रॅच्युइटी वगैरेचे मिळाले होते, ते सर्व घर आणि शेती घेण्यात आणि नंतर ती शेती सुधारण्यात जवळजवळ संपले. त्याशिवाय त्यांनी कर्जही काढले होते. 'इथे शेती करणं म्हणजे वाळूत मुतल्यासारखं आहे. सगळे पैसे संपवून लौकरच हा भिकारी बनणार,' असे एकदोघांनी म्हटले होते, पण त्याकडे दुर्लक्ष करून जोशींनी आपले काम अगदी निष्ठेने चालू ठेवले. जोशी सांगत होते,

१००अंगारवाटा... शोध शरद जोशींचा