पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/86

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शक्ती रोग्यात राहत नाही. एडस् चा रोगी सर्दी पडशानेसुद्धा मरू शकतो.
 कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत. सर्वात जास्त आढळणाऱ्या प्रकारात शरीरात काही पेशींच्या गाठी तयार होतात. या पेशी शरीरावर पोसतात, पण शरीराच्या उपयोगी काम कोणतेच करत नाहीत. झाडावरच्या बांडगुळाप्रमाणे हा पेशींचा गठ्ठा वाढत जातो. पसरत जातो. त्याच्या वाढीमुळे शरीराचे चलनवलन बंद होते आणि माणूस मरतो.
 एडस् रोगाची बाधा शरीराच्या कोणा एका भागापुरती मर्यादित होत नाही. सर्व रक्तप्रवाहच दूषित होतो. शरीरावर बाहेरून आक्रमण झाले तर त्यांच्याशी निकराने झुंजणाऱ्या आणि शरीराचे रक्षण करणाऱ्या पेशी नाहीशा होतात आणि प्रतिकार शक्तीच संपते.
 रोगाचे निदान
 दोन्ही रोग महाभयानक, एकेक मृत्यूला पुरेसा आहे, हे दोन्ही रोग कोणा एकाच माणसाला झाले तर काय सांगावे? अशा परिस्थितीची कल्पनाही करणे कठीण आहे. कॅन्सर किंवा एडस् चा रोगी परीक्षेसाठी आला, त्याच्या रोगाचे निदान झाले म्हणजे डॉक्टर रोग्याला आणि त्याच्या नातेवाईकांना शांतपणे हळूहळू परिस्थिती समजावून सांगतो. रोगाचे स्वरूप सांगतो, रोगी आणि नातेवाईक धक्क्याने कोसळून जाणार नाहीत अशा पद्धतीने त्यांना सगळी परिस्थिती समजावून सांगतो; पण त्याबरोबर त्यांच्या मनात खोटी आशा फुलेल असेही करत नाही.
 मीही अशाच प्रयत्नात आहे. आपल्या देशाचे भले इच्छिणाऱ्या मित्रमंडळीचे धैर्य कोसळता कामा नये, त्यांची हिंमत हादरता कामा नये, समोर असलेल्या शर्थीच्या झुंजीकरिता त्यांनी तयार झाले पाहिजे अशा पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. देश आजारी आहे; आजार तसा गंभीर आहे. कॅन्सरचा संशय आहे, किंबहुना कॅन्सर आहेच. कॅन्सरला काही उपाययोजना करून पाहता येईल, कॅन्सरच्या वाढत्या गाठी शस्त्रक्रिया करून काढून टाकणे कदाचित शक्य होईल, पण पराकोटीचे प्रयत्न लागतील. कारण कॅन्सरबरोबरच सगळा देश HIV +ve आहे. सारांश, देशाला कॅन्सरबरोबरच एडस् चीही बाधा झाली आहे.
 घाबरून जाऊन धीर सोडण्यासारखे काही नाही; देश अजून वाचू शकेल; पण आजाराचे स्वरूप गंभीर आहे, प्राणघातक आहे, हे समजून प्रयत्न करावे लागतील.

 शरीर कोणते, कॅन्सर कोणता?

भारतासाठी । ८६