पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/240

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

निष्कर्षाचा शोध बाजूस पडला आहे. नव्या शास्त्रज्ञांना, कदाचित् असल्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी सवड नसावी; पण विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या प्रगतीसाठी स्वातंत्र्य आणि विज्ञानदृष्टी प्राणपणाने जपणे व त्यासाठी, आवश्यक तर, सामाजिक, राजकीय संघटन आणि संघर्ष अपरिहार्य आहे.
 ही सामाजिक जबाबदारी वैज्ञानिकांनी पेलली नाही आणि ते केवळ नवनवे संशोधनच करीत राहिले तर त्यांची स्थिती उत्तमोत्तम बियाणे तयार करून जमिनीच्या मशागतीची काळजी न करणाऱ्या शेतकऱ्याप्रमाणे होईल. तंत्रज्ञानाविषयी समाजात दुस्वास आहेच; तो असाच वाढू दिला तर सध्या जैविक बियाण्यांच्या प्रायोगिक शेतीवर हल्ले होतात, उद्या प्रतिभाशून्यांच्या झुंडी साऱ्या विज्ञानशाळांना नष्ट करण्यासाठी घोंघावू लागतील. शेवटी सीतेप्रमाणेच तंत्रज्ञानालाही 'भूमिमाते, मला तुझ्या पोटात घे' म्हणण्याची वेळ न येवो!

(२१ मे २००१)

◆◆

भारतासाठी । २४०