पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/209

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "खुल्या बाजारपेठेच्या व्यवस्थेचा स्वीकार न करता आपल्या देशामध्ये स्वदेशीच्या भिंती बांधून रहाणं आवश्यक आहे." असं ते म्हणू लागले. 'गोदरेज'चं संरक्षण व्हावं असं जॉर्ज फर्नाडिस म्हणू लागले. ज्या कारखानदारांविरुद्ध ही मंडळी संप करत, शिव्यागाळ करीत असत त्या कारखानदारांची मक्तेदारी संपणार, त्यांना स्पर्धेला तोंड दणे अशक्य होणार, खुलीकरणामुळे त्यांचा तोटा होणार हे दिसू लागताच ती मंडळी 'गोदरेजचा तोटा म्हणजे देशाचा तोटा' अशा तऱ्हेने बोलू लागली; पण ज्योति बसूंसारखे जे सत्तेवर आहेत ते मात्र परदेशी वाऱ्या करून आपल्या राज्यामध्ये परदेशातून जास्तीत जास्त प्रयत्न करतात. देवेगौडा नंतर पंतप्रधान झाले. केंद्रातसुद्धा त्यांनी त्यांचा जुना स्वदेशीवाद टाकून, समाजवाद, नियोजनव्यवस्था या कल्पना टाकून खुलेपणाचा आग्रह सुरू केला. दोन वर्षांपूर्वी 'स्वदेशी' विषयावर टेलिविजनवर एक मोठा परिसंवाद झाला. एका बाजूला 'स्वदेशी जागरण मंच'चे लोक होते, दुसऱ्या बाजूला मी आणि माझे काही मित्र होतो. 'स्वदेशी जागरण मंचा'मध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीचे लोक आहेत; काही त्यांच्या जवळपासचे आहेत. त्यांनी फारच कडवेपणाने आपली भूमिका मांडली. पूर्वी ते जितक्या कडवेपणाने मुसलमानांविषयी बोलत तसेच ते 'मल्टिनॅशनल्स्' विषयी बोलत असतात. तशी ही मंडळी मोठी निष्ठावान असतात! कोणतं का तत्त्व असेना, त्या तत्त्वावर श्रद्धा असेल आणि त्याप्रमाणे कोणी वागू लागलं तर त्याला कोण कशाला हरकत घेईल? जर का त्यांच्या स्वदेशीच्या तत्त्वाप्रमाणे त्यांनी आचरण केलं आणि त्याने देशाचा फायदा झाला तर त्यांचे म्हणणं सारा देश मानेल. "अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी ही तत्त्वाला धरून राहणारी माणसे आहेत." अशी त्यांचेच शिष्य वाहवा करीत असतात. ते सत्तेवर आले आणि पहिले तीस दिवस त्यांनी आपलं 'स्वदेशी' विषयीचं मत बदलल्याचं दिसू दिलं नाही. याबद्दल त्यांना मानलं पाहिजे; पण त्यानंतर वित्तमंत्री यशवंत सिन्हा, प्रधानमंत्री यांनी आपली भाषा झपाट्याने बदलायला सुरुवात केली.

 आज परिस्थिती अशी की पूर्वी मनमोहनसिंग जे बोलत असत ते आता यशवंत सिन्हा बोलतात आणि ते आता सत्तेत राहिले नाही ते मनमोहनसिंग मात्र उलटं बोलू लागले आहेत, पंचमढीच्या शिबिरात पहिलं उद्दिष्ट जाहिरच करून टाकले की, आमचं पहिलं उद्दिष्ट 'समाजवादी व्यवस्था' पुन्हा आणणे हे राहिल आणि इकडे यशवंत सिन्हा म्हणत आहेत की, खुलीकरण जास्तीत जास्त वेगाने पुढे नेणे यासाठी आम्ही प्रतिज्ञाबद्ध आहोत.

भारतासाठी । २०९